शक्तिपीठ महामार्गास 2 मंत्र्यांचा विरोध, मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद; राजू शेट्टींचा इशारा

मुंबई : विधानसभा निवडणुकांपूर्वी शक्तीपेथ महामार्गास (शक्ती) विरोध लक्षात घेता सावध भूमिका घेणाऱ्या महायुती सरकारने अखेर महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग – पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता दिली आहे. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग आणि  पंढरपूर, अंबेजोगाई सहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा शक्तिपीठ महामार्ग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनाविस (देवेंद्र फड्नाविस) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी 20 हजार  कोटी  रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या महामार्गास कोल्हापूर, धाराशिव, सोलापूर येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळेच, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मंत्र्‍यांनी मंत्रिमंडळ बैठकीत शक्तिपीठ महामार्गावरुन नाराजी व्यक्त केली. तर, शेतकरी नेते राजू शेट्टींनीही (Raju shetty) कडक शब्दात इशारा दिला आहे.

महायुती सरकारचा ड्रिम प्रोजेक्ट शक्तिपीठ महामार्गाबाबत कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केली. लोकसभा, विधानसभेला शक्तिपीठ महामार्गामुळे मोठा फटका बसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणे अपेक्षित असे मत कॅबिनेट बैठकीत या मंत्र्‍यांनी मांडल्याचे सूत्रांची माहिती आहे.

12 जिल्हे आणि 39 तालुक्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग राज्यासाठी फायदेशीर आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध सरकारला परवडण्याजोगा नाही, अशी भूमिका काही मंत्र्‍यांनी बैठकीत मांडली. मात्र, तरीही सरकार शक्तिपीठ महामार्गाच्या निर्णयावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे.

गोफण अन् दगडं तयार ठेवा

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे लुटारूंचे टोळके झाले आहे.  शक्तिपीठ महामार्ग म्हणजे 30 हजार कोटींमध्ये होणारा रस्ता 86 हजार कोटीवर नेला आहे. 50 हजार कोटी लुटण्याचा डाव आम्ही शेतकरी हाणून पाडू, अशा शब्दात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशारा दिला. तसेच, मोजणी करायला येणाऱ्यांना शेतकरी गोफनीच्या दगडाने धडा शिकवतील, शेतकऱ्यांनो आपली गोफण आणि दगडं तयार ठेवा. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापी होऊ देणार नाही, असेही राजू शेट्टींनी म्हटले.

गोळीबार केला तरी जमिनी सोडणार नाही

शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनास 20,000 कोटींची तरतूद मंत्रिमंडळाने केल्याच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाचे नेते राजन क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी या प्रकल्पास मान्यता देणार नाही, महाराष्ट्राला कर्जात बुडवणारा आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या जमिनी कवडीमोल दराने घेण्याचा हा सरकारचा डाव आहे. पण, गोळीबार जरी केला तरी शेतकरी आपल्या जमिनी सोडणार नाही, असे क्षीरसागर यांनी म्हटले.

महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शासनाने शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचे जाहीर केले होते. मात्र, विधानसभेतील बहुमतानंतर पुन्हा महामार्गाचे काम सुरू करणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकार शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करत आहे, शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी दोन वर्षांपासून आमचा संघर्ष सुरू आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी धाराशिव येथील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

हेही वाचा

शक्तिपीठ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.