राम मंदिराच्या लुटीत 25 महमूद गजनी टोळीत आलेत! संजय राऊत यांचा घणाघात; महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजपासून रामरक्षा आंदोलन

आज आम्ही रामरक्षा आंदोलन करणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजपासून या आंदोलनाला सुरूवात होतेय. हे आंदोलन महाराष्ट्राच्या सीमेबाहेरही जाईल. महमूद गजनी एकच होता. राम मंदिराच्या लुटीत 25 महमूद गजनी हे टोळीत आले आहेत, असा हल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चढवला.

राम मंदिरात जे दरोडे पडलेत त्यात रामाचा मुकूट, पादुका, कर्णफुले चोरली गेली आहेत.सीतामाईचे मंगळसूत्र चोरलं गेलं आहे. सीतामाईला दान केलेली 27 मंगळसूत्रे चोरली गेली आहे. हे चोरणारे कोण आहेत? असा प्रश्न यावेळी राऊतांनी उपस्थित केला. हे चोरी करणारे मिश्रा, दुबे, चंपत राय आहेत. नेतृत्व कुणाचं आहे मोदींचं? काय तुमचं धाडस? सीतामाईची पैजणं, कंठहार, रामाची कर्णफुलं, चोरीली गेली आहे. विष खाऊन मेलं पाहिजे या सत्ताधाऱ्यांनी. जे आम्हाला प्रश्न विचारातहेत रामरक्षा आंदोलनावरून त्यांचा बाप दुर्योधन आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

तुमच्या हातात अफाट सत्ता यंत्रणा आणि लुटलेला राममंदिराचा पैसा आहे. ठेकेदारांकडून देणग्या घेऊन कार्यक्रम केले. हा पापाचा पैसा तुम्हाला आणि तुमच्या मुला बाळांना पचणार नाही. टॉलस्टायच्या म्हाताऱ्यासारखे दोन फूट जमिनीमध्ये सर्व कोसळणार आहेत. काल एका आमदाराला वीस कोटींची ऑफर दिली. माणसाला किती हाव आणि हव्यास असावा? असा प्रश्न यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला. हिंदुत्वाचे धर्मग्रंथ जरा वाचा. राम कृष्ण ही जगले नाही.कुणी अमर नाही. मोदी अमर नाही, अमित शहा अमर नाही, शिंदे, फडणवीस अजारामर नाही. नियती अशी असते मग तुम्हाला दाखवते, असे म्हणत संजय राऊत यांनी शरसंधान साधले.

यावेळी राऊत म्हणाले, टॉलस्टायची एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे. जास्त हव्यास किंवा फाजील महत्त्वाकांक्षा ठेवली की त्याचा अंत काय होतो? हे टॉलस्टायने त्याच्या कथेमध्ये सांगितलं. त्या कथेतील जो म्हातारा आहे त्याला संपत्ती आणि जमिनीची इतकी भूक लागली की, तो इतका धावला धावला. त्याला असं सांगण्यात आलं होतं की, सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तू जितका चालशील तेवढी जमीन तुला मिळेल. तो धावत राहिला आणि चालता चालता तो अखेर आजारी पडला आणि नंतर ज्युपिटर हॉस्पिटलला अॅडमिट झाला. तरी तो धावत राहिला. आणि धावता धावता तो पडला. शेवटी त्याला काही मिळालं नाही. अखेर गावकऱ्यांनी त्याला दो गज जमीनमध्ये गाडलं. हे सर्व राजकारण्यांसाठी लागू आहे. अमित शहा, नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अशा सर्वांसाठी लागू आहे. या गोष्टीतील तत्व असं आहे की, कुठे थांबायचं हे कळत नाही त्याचा अंत वाईट आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला.

समाधान खूप महत्त्वाचं आहे असे सांगत संजय राऊत म्हणाले, तुम्ही आमदार फोडताय, खासदार फोडताय, कार्यकर्ते फोडताय… मग इस्पितळात जाऊन स्ट्रेससाठी दाखल व्हावं लागतंय. किती पाहिजे तुम्हाला हे सगळं थांबवलं पाहिजे. टॉलस्टॉयची ही कथा लोकांनी वाचावी. पण आताच्या राज्यकर्त्यांना वाचण्याची आवड नाही.अतिश्रमामुळे शिंदे आजारी असल्याचे मला कळले असे यावेळी राऊत म्हणाले, यावर अधिक बोलताना ते म्हणाले, टॉलस्टॉयच्या कथेतला म्हातारा जमिनीसाठी, पदासाठी पैशासाठी तोही अतिश्रमानेच पडला. तो म्हातारा टांगा चालवायचा. अशी गोष्ट आहे. मी माझ्या मनातलं सांगत नाही. टॉलस्टॉयच्या कथा कांदबऱ्या वाचा, त्यातही असाच म्हातारा तुम्हाला दिसेल, असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.