मुख्यमंत्री म्हणाले जूनमध्ये कर्जमाफी करतो, उद्धव ठाकरेंचं खरमरीत पत्र; सरकारला अनेक सवाल
मुंबईमं: राज्यात एकीकडे महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून राजकारण तापलं असताना दुसरीकडे माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडलं आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांच्यासह शिष्टमंडळाची बैठक झाली असून पुढील 6 महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यानंतर, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (उद्धव विचार) यांनी पत्रक काढून मागणी केली आहे. कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे. त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभारः अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील काय? शेतकऱ्यांची दैनावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार? पुढच्या वर्षी जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का? पुढील वर्षी जुनच्या कर्जमाफीत हे हप्ते माफ होणार असतील तर ते का भरायचे? ते न भरता शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का? जर नव्याने कर्ज मिळणार असेल तर ते देखील माफ होणार का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?, असे एक ना अनेस सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.
कर्जमाफी देण्याची हीच ती वेळ
अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी माती मागतो आहे. पण त्याविषयी सरकार काहीच करायला तयार नाही. जगाचे पोट भरणारा शेतकरी आज भयंकर संकटात सापडला आहे. पाऊस अजूनही शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. सरकारने हजारो कोटींच्या नुकसानभरपाईची घोषणा केली; पण शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे जमा झाले हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांपासून पाऊस पडतो आहे. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी ‘योग्य वेळ’ कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे.
सरकार शेतकऱ्यांना केवळ खेळवत आहे
मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून सातत्याने शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. आत्महत्यांचे हे वाढते आकडे सरकारच्या कानावर आदळत नाहीत काय? तरीही सरकारने कर्जमुक्तीसाठी पुढच्या वर्षी जूनचा मुहूर्त काढावा, हे चीड आणणारे व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. कर्जमुक्तीसाठी चालढकल करून हे सरकार शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलत आहे. जूनपर्यंत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे काय? सरकार शेतकऱ्यांना केवळ खेळवत आहे. थोडक्यात शेतकऱ्यांच्या आत्ताच्या हालअपेष्टा तशाच राहणार, पुढच्या जूनचा गुळ सरकारने शेतकऱ्यांच्या कोपराला लावला आहे. आत्ता आवाज करायचा नाही, असेच बहुदा सरकारला सांगायचे असावे. शेतकऱ्यांना फसवण्याचे हे खेळ बंद करा आणि अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा, असे आम्ही मायबाप सरकारल 1 शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून सांगत आहोत.
हेही वाचा
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
आणखी वाचा
 
			 
											
Comments are closed.