आयआयटीच्या नावात ‘मुंबई’ नसल्याने मी खूश, केंद्रीय मंत्र्यांचं विधान, मनसेकडून जोरदार प्रहार; म


आयआयटी मुंबई: आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयआयटी (IIT)मुंबईच्या  पी. सी. सक्सेना सभागृहात आयोजित कार्यक्रमात क्वांटम-तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातील तांत्रिक प्रगती या विषयावर ते भाष्य करत होते. त्याचदरम्यान त्यांनी आयआयटीच्या नावातील ‘बॉम्बे’ (Bombay) हे नाव कायम ठेवण्यात आले, याबद्दल समाधान व्यक्त केले.

“आयआयटीच्या नावात तुम्ही ‘बॉम्बे’ कायम ठेवले आणि त्याचे ‘मुंबई’ केले नाही, याबद्दल मी खूश आहे. आयआयटी मद्रासबद्दलही माझ्या याच भावना आहेत,” असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठी-अमराठी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर असताना केंद्रातील मंत्र्यांकडून आलेले हे विधान वादाला तोंड फोडणारे ठरू शकते, असा राजकीय वर्तुळात कयास बांधला जात आहे. डॉ. जितेंद्र सिंह यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

MNS on Jitendra Singh: पुढच्या वेळी त्यांचा मनसे सत्कार करू

डॉ. जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यामनसे कडून त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आलाय. मनसे नेते गजानन काळे म्हणाले की, आय.आय.टी. बॉम्बेचे “आय.आय.टी. मुंबई” केले नाही याबद्दल मी आभार मानतो, असे निर्लज्ज आणि बेशरम विधान केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग मुंबईत येऊन करतात. मराठी, मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आणि हिणवणी करण्याची एकही संधी भाजप आणि भाजपचे नेते सोडत नाही. या भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे बूट चाटणारे अमित साटम आणि आशिष शेलार आपण कुठल्या बिळात लपले आहेत? या आता वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळ, पश्चात्ताप करा आणि नाक घासून माफी मागा मराठी माणसाची. आपले केंद्रीय नेते, भाजपचे जितेंद्र सिंह यांचा जाहीर निषेध करण्याची हिंमत आहे का मुंबईतील भाजपा नेत्यांमध्ये? पुढच्या वेळी जितेंद्र सिंह मुंबईत येतील त्यावेळी त्यांचा मनसे सत्कार करू, असा इशारा त्यांनी दिलाय.

MNS on Jitendra Singh: हा टोमणा राज्य सरकारला मारला आहे का?

तर मनसे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले की, काल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधान केले की, बॉम्बे आयआयटीचे नाव मुंबई झालेले नाही. या विधानावरून त्यांचा मुंबईबद्दलचा आकस दिसतो. भाजपने अनेक रस्त्यांचे नावं बदलले, अनेक जागेंचे नाव बदलले. मुघल नाव खोडून काढण्यासाठी हे केले गेले. एल्फिस्टनचे देखील प्रभादेवी केले. मग असे असताना हा टोमणा राज्य सरकारला मारला आहे का? केंद्रीय मंत्र्यांनी काढलेला हा चिमटा त्यावर आता राज्यातील नेते, मुंबईतील नेते दादरला येऊन सद्भावना मांडत स्मृतीस्थळावर पश्चाताप करणार आहेत का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधलाय.

आणखी वाचा

गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत बर्गेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश

आणखी वाचा

Comments are closed.