रोहित पवार अन् सुनिल तटकरे आमनेसामने येताच काय घडलं? व्हिडीओ आला समोर
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणात घातपात असल्याची शंका व्यक्त करत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) चांगलेच आक्रमक झाले आहेत. रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत पोलिसांकडे एफआयआरची मागणी केली आहे, तर रोहित पवारांच्या या मागण्यांवरती आणि घेतलेल्या पत्रकार परिषदेवरती टीका करत ते स्टंट करत असल्याची टीका केली, त्याचबरोबर अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या विलीनीकरणाच्या चर्चेवरती देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी सडकून टीका केली. यानंतर आता राजकीय वर्तुळात रोहित पवार (Rohit Pawar) अजित पवारांच्या पक्षाच्या काही बड्या नेत्यांच्या विरोधात बोलत आहेत, त्यांच्यावर टीका करताना दिसत आहे, अशातच आज देखील रोहित पवारांनी अपघाताबाबत मनसे अध्यक्ष रोहित पवारांची भेट घेतली, त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे, प्रफुल पटेलांवर टीका केली, त्यानंतर काही वेळानंतर रोहित पवार आणि सुनिल तटकरे एकमेकांसमोर आल्याचे दिसून आले. मात्र त्यांनी एकमेकांना भेटणं तसेच बोलणं टाळलं याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्या ठिकाणी रोहित पवार गेले होते, त्याचवेळी ते असलेल्या ठिकाणीच सुनील तटकरे देखील आलेले होते, त्यावेळी रोहित पवारांनी आणि सुनील तटकरेंनी एकमेकांशी बोलणं टाळलं त्याचबरोबर या दोन्ही नेत्यांची तोंडं देखील वेगवेगळ्या दिशेला होती.
रोहित पवार आणि सुनिल तटकरे एकमेकांसमोर आल्याचे दिसून आले. मात्र त्यांनी एकमेकांना भेटणं तसेच बोलणं टाळलं याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. #रोहितपवार #सुनीलतकारे pic.twitter.com/GAuZHCkEYu
— अंकिता शांतीनाथ खाणे (@KhaneAnkita) २७ फेब्रुवारी २०२६
आज अजित पवारांच्या अपघाताच्या तपासाच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर रोहित पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. या भेटींनंतर त्यांनी सुनील तटकरेंसह प्रफुल पटेल यांच्यासोबतच पक्षातील काही चार नेते आहेत, त्यांच्या नावाचा उल्लेख न करता इशारा दिला आहे.
जरा सांभाळून वागा, सांभाळून बोला, एवढेच सांगतो: रोहित पवार
आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी, त्याच्याबरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. तुम्ही काल स्टेजवर आणि इतर गोष्टींमध्ये जरा सांभाळून वागा कारण महाराष्ट्र बघतोय. काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं . जयला जागा सुद्धा कुठे द्यायची तर ते नेते ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करता म्हणजे हे बघून तुम्ही आम्हाला म्हणता राजकारण करता ? आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी दादांसारखेच काम करतील, पण जरा सांभाळून वागा, सांभाळून बोला, एवढेच सांगतो
अजित पर्व संपणारच नाही: रोहित पवार
पुढे ते म्हणाले, नुसती भाषण करत चाललेले आहात, आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील जनता, इतर पक्षातील लोक, दादांना न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत आणि हे लोक मात्र भाषण करत राजकीय टिप्पणी करत असतील आणि दुर्दैव असं की त्या भाषणामध्ये एक तर महाशय असे बोलले की, नवीन पर्व सुरू झालं आहे, लक्षात ठेवा, अजित पर्व संपणारच नाही, कारण लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे, ही घटना घडली याबाबतीत शंका आहेत, त्यामुळे न्याय देण्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर आजच ती वेळ आहे, आजच एफआयआर घेण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करा, असं म्हणत रोहित पवार यांनी नाव न घेता सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली आहे.
अजित पवारांना कंट्रोल करु शकत नव्हते, पण आता सुनेत्रा पवारांना कंट्रोल करु शकतो असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा (तटकरे-पटेलांचा) गैरसमज आहे. एक पुतण्या म्हणून विनंती आहे की काकींनीही सांभाळून राहावं असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे, त्याचबरोबर शरद पवारांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चाललेल्या चर्चांवर बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित पवारांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी कुठेही लोकांना अडचण होऊ नये, दंगल उसळू नये म्हणून लोकांच्या हितासाठी शरद पवार साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं. ते बोलताना कॅमेऱ्याकडे बघत नव्हते तर त्यांना वाचावं लागत होतं. पवार साहेब इतके भावनिक झाले होते, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्यामुळे त्यांना काही गोष्टी लिहून दिल्या, त्या त्यांनी वाचल्या. याचं तुम्ही आज राजकारण करत आहात.
आणखी वाचा
Comments are closed.