भाजपसोबत सोयरिक केलेला नेता कितीही मर्द असला तरी सरपटणारा प्राणी होतो; संजय राऊतांनी भुजबळांना
छगन भुजबळवरील संजय रौत: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना डावलण्यात आलं होतं. त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळ यांची नाराजी उफाळून आली होती. मात्र, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यानंतर भुजबळ यांना अखेर महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली. मुंडे यांच्या जागेवर अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यानंतर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी मोठे गौप्यस्फोट केले. निवडणूक जिंकल्यानंतर पक्षानेच मला आमदारकीचा राजीनामा देण्यास सांगितलं होतं, असे त्यांनी म्हटले. तसेच धनंजय मुंडे यांना क्लीन चीट मिळाली तर राजीनामा देईन, असेही वक्तव्य भुजबळांनी केले. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांचा चोरलेला पक्ष आहे. त्याचे प्रमुख अमित शाह आहेत, ते दिल्लीत बसतात. एकनाथ शिंदे यांचा यांचा जो पक्ष आहे तो त्यांचा नाही तो अमित शाह यांचा पक्ष आहे. त्यामुळे भुजबळ यांनी सांगितले की, मला मंत्री करण्यामध्ये अमित शाह, नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांचे योगदान आहे. त्यांनी अजित पवार यांचे नाव घेतले आहे का? भाजपसोबत सोयरिक केलेला कोणताही नेता कालांतराने कितीही मर्द असला तरी तो सरपटणारा प्राणी होतो, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
छगन भुजबळ आता भाजपमध्येच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं तर छगन भुजबळ पालकमंत्री काय तिसरे उपमुख्यमंत्री देखील होतील, असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, एकेकाळी भारतीय जनता पक्ष एकही उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता. ते आता चार उपमुख्यमंत्री करू शकतात, ते गद्दारांसाठी नवीन घटना तयार करून एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री देखील करू क्षकतात. भाजपचे काही खरे नाही. छगन भुजबळ आता भाजपमध्येच आहेत. ते अमित शाह यांच्या पक्षात आहेत. तांत्रिक दृष्ट्या ते दुसऱ्या गटात आहे. त्यांनी अमित शाह यांचे नेतृत्व मानले आहे. ज्या अमित शाहांनी शिवसेनेचे तुकडे केले, आता त्यांना मुंबई आणि महाराष्ट्र तोडायचा आहे त्या पक्षात भुजबळ आहेत. हेच भुजबळ कधीकाळी मराठी माणसासाठी आणि सीमा प्रश्नासाठी रस्तावर उतरले होते, असे म्हणत त्यांनी भुजबळांवर निशाणा साधला.
चर्चा कसल्या, मी बोलतोय ना ठाकरे बंधू एकत्र येणार
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, यात चर्चा कसल्या? मी बोलतोय ना ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. पडदा उघडायला वेळ आहे, तो योग्य वेळी उघडला जाईल. उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक भूमिका आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात भावना असेल तर हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही, अशी उध्दव ठाकरे यांची भूमिका आहे. ईव्हीएम घोटाळ्यामुळे आम्हाला जरी कमी जागा मिळाल्या असल्या तरी महाराष्ट्रामधील शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे. महाराष्टातील मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी मराठी माणूस गट-तट विसरून एकत्र आला आणि गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या छाताडावर बसला तर ही बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
https://www.youtube.com/watch?v=noqxca3ayxy
अधिक पाहा..
Comments are closed.