मनोज जरांगे आरपारच्या लढाईसाठी मुंबईला निघाले, गर्दीत पत्नी अन् मुलगी दिसताच डोळ्यांच्या कडा पा
Manoj Jarange Patil Maratha Reservation March: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्त्वाखाली आज (बुधवारी) मराठा आंदोलक अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जुन्नर, राजगुरु नगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा 28 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहे. मुंबई दौऱ्यावर जाताना मनोज जरांगे यांची त्यांच्या परिवारासोबत भेट झाली. यावेळी मनोज जरांगेंसह पत्नी आणि मुलीला अश्रू अनावर झाले. अंकुशनगर येथील मनोज जरांगे यांच्या घराजवळ परिवाराकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं. यावेळी जमलेल्या महिलांनाही अश्रू अनावर झाले.
अंकुशनगर येथे आपल्या परिवाराची भेट घेतली
मुंबई दौऱ्यावर जाताना मनोज जरांगे यांनी प्रवासा दरम्यान अंकुशनगर येथे आपल्या परिवाराची भेट घेतली, यावेळी त्यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी औक्षण केलं, याप्रसंगी मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुला मुलीला अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं. यावेळी जरांगे यांनी आपल्या मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जमलेले इतर महिलांनी देखील जरांगेंच औक्षण केलं. यावेळी सर्वजण भावूक झाल्याचं दिसून आलं.
ही आरपारची आणि शेवटची लढाई
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईला निघण्यापूर्वी आझाद मैदानात दीर्घकाळ आमरण उपोषणाला बसावे लागेल, याची कल्पना मराठा आंदोलकांना दिली. ही आरपारची आणि शेवटची लढाई आहे. कितीही वेळ लागला तरी आपण मुंबई सोडायची नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक तब्बल महिनाभर मुंबईत राहावे लागेल, अशी तयारी करुन घराबाहेर पडले आहेत. मनोज जरंगे यांनी आवाहन केल्यानंतर राज्यभरातील गाव गाड्यांमधून मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले आहेत. परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून विविध गाड्यांच्या माध्यमातून मराठा समाजबांधव, युवक हे मुंबईकडे निघाले आहेत. दोन महिन्याचा किराणा, गॅस शेगडी, भगुने व इतर साहित्य घेऊन हे मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार या मराठा बांधवांनी केला आहे.
जिल्ह्यातून ट्रक भरून मराठा समाज अंतरवली सराटीच्या दिशेने
मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू राहिलेल्या बीड जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आंदोलनासाठी पाठिंबा वाढतोय. मुंबईकडे जाण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. आणि त्यांच्यासोबत जाण्यासाठी बीडमधून मोठ्या संख्येने मराठा समाज अंतरवली सराटीत दाखल झाले. ट्रकच्या ट्रक भरून मराठा समाजातील सदस्य पंधरा दिवसांची शिदोरी घेऊन मुंबईकडे निघाले आहेत. एक ना अनेक ट्रक अशा स्वरूपात अंतरवली सराटीवरुन मुंबईला निघाले होते.
https://www.youtube.com/watch?v=nlacv0ghyza
आणखी वाचा
Comments are closed.