राज्यात सात महिन्यांत चार लाख नावे वगळली, 18 लाखाहून अधिक नवीन मतदार; निवडणूक आयोगाकडून आकडेवार
निवडणूक आयोग: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Local Body Election) मतदारांची अद्ययावत यादी राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) प्रसिद्ध केली आहे. आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर 1 जुलै 2025 रोजीची अंतिम मतदार यादी प्रसारित केली असून, त्यानुसार राज्यातील एकूण मतदारसंख्या 9 कोटी 84 लाख 96 हजार 626 इतकी झाली आहे.
मागील सात महिन्यांच्या कालावधीत राज्यात 18 लाख 80 हजार 553 नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे, तर 4 लाख 9 हजार 46 मतदारांची नावे मतदार याद्यांतून वगळण्यात आली आहेत. मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील मतदारसंख्या 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 इतकी होती. त्यामध्ये यंदा जवळपास 14.7 लाख मतदारांची वाढ झाली आहे.
Election Commission: ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक नव्या मतदारांची नोंदणी
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नव्या मतदार नोंदणीचा आढावा घेतल्यास ठाणे जिल्हा सर्वात पुढे असल्याचे आकडेवारीतून दिसते. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 2 लाख 71 हजार 666 नव्या मतदारांनी अर्ज दाखल केले. त्याच जिल्ह्यात 45 हजार 800 मतदारांनी आपली नावे वगळण्यासाठी अर्ज केले आहेत. पुणे जिल्ह्यात 1 लाख 82 हजार 490 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. मुंबई उपनगरात 95 हजार 630 नव्या मतदारांची नोंद झाली असून, 44 हजार जणांची नावे मतदार याद्यांतून वगळली गेली आहेत.
Election Commission: आयोगाकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आयोगाकडे फॉर्म क्र. 6 द्वारे 16 लाख 83 हजार 573 नागरिकांनी अर्ज दाखल केले. तसेच परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी असलेल्या फॉर्म क्र. 6 अ द्वारे देखील काही अर्ज प्राप्त झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
NCP Sharad Pawar Faction: शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्षचिन्हाशी साधर्म्य असलेल्या ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ या स्वतंत्र चिन्हामुळे फटका बसल्याची तक्रार होती. या संदर्भात शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे ‘पिपाणी’ हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. अखेर आयोगाने ती मागणी मान्य करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीच्या मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ हे चिन्ह वगळले आहे. ‘पिपाणी’ हे चिन्ह आयोगाच्या यादीत ‘तुतारी’ या नावाने नोंदवले गेले होते. या नामसाधर्म्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांना मिळणारी मते अपक्ष उमेदवारांकडे वळल्याचा दावा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पवार गटाने निवडणूक आयोगाला हे चिन्ह वगळण्याची औपचारिक मागणी केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी आयोगाने आपल्या 194 मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ हे चिन्ह वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.