शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार; राज्यसभेबाबत दोन्ही आघाड्यांची वेट अँड
मुंबई: राज्यसभेबाबत दोन्ही आघाड्यांची भूमिका वेट अँड वॉच असल्याचं दिसून येत आहे. अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी आहे तरी उमेदवारी यादी प्रलंबितच असल्याचं चित्र दिसून येत आहे. शरद पवारांना उमेदवारी देण्यावरून महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याने अद्यापही कोणत्याच नावाची घोषणा झालेली नाही. राज्यसभेच्या (Rajyasabha Election) एकमेव जागेवर ठाकरेंची शिवसेना, काँग्रेससह पवार गटाचा दावा आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा हवाला देत काँग्रेसकडून दावा कायम तर सेनेचाही राज्यसभेसाठी आग्रह आहे. तर दुसरीकडे मविआच्या भूमिकेवर भाजप नवा डाव टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांना उमेदवारी दिली नाही तर भाजप पाचवा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार उमेदवार नसल्यास भाजपचे ५ तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभा लढणार अशी सूत्रांची माहिती माहिती आहे. (Rajyasabha Election)
शिवसेनेकडे राहुल शेवाळे यांचं नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित
शिवसेनेकडे राहुल शेवाळे यांचं नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित मानलं जात असलं तरी देखील पक्षातून ज्योती वाघमारे, शायना एनसी, संजय निरुपम यांचीही नावं चर्चेत आहे. तर पक्षातील ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा पक्षश्रेष्ठीकडे दर्शवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे, निर्णय घेण्यापूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबतही चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेत आता राज्यसभेसाठी कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.(Rajyasabha Election)
16 तारखेला मतदान होणार
राज्यसभेची (Rajyasabha) निवडणूक जाहीर झाली असून याच महिन्यातील 16 तारखेला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक होत असून महायुतीकडे 6 आणि महाविकास आघाडीकडे 1 जागा आहे. त्यामध्ये, भाजपला 4 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळणार आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव निश्चित झालं आहे. तर, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना उमेदवारांची प्रतिक्षा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्ष आग्रही असल्याचे पाहायला मिळालं. त्यात, संख्याबळ अधिक असल्याने शिवसेना आणि काँग्रेसच जास्त आग्रही होती.
भाजपकडून कोणाची नावे जाहीर होणार?
राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले असून सर्वच राजकीय पक्ष आपले उमेदवार निश्चित करत आहेत. भाजपकडून आजच 6 राज्यातील 9 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रातील उमदेवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आली नाहीत. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडूनही कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. दरम्यान, मविआकडून तिन्ही पक्षांमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी रस्सीखेच सुरू असताना शरद पवारांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे, शरद पवार पुन्हा दिल्लीत जाण्यास आग्रही असल्याचे दिसून येते.
राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक
राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. तामिळनाडूतून 6, बिहार आणि पश्चिम बंगालमधून 5 आणि ओडिशा राज्यातून 4, आसामधून 3, तेलंगाणातून 2 आणि छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.