रात्रीस खेळ चाले! हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस

कोल्हापूर : पुरोगामी विचारसरणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि अघोरी विद्येचा प्रकार समोर आला आहे. हातकणंगले येथे स्मशानभूमीत प्रेतदहनानंतर रात्री अघोरी विधी करण्यात आल्याची घटना घडली. रक्षा विसर्जनाच्या वेळी हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

हातकणंगलेतील निवृत्त तहसीलदार श्रीपती चौगुले यांचे 11 एप्रिल रोजी निधन झाले. 13 एप्रिल रोजी त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पडत असताना हा प्रकार समोर आला. यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. परंतु घडलेल्या प्रकारावर नागरिक संतप्त झाल्याचं दिसून आलं.

Hatkanangale Aghori Vidya Incident : स्मशानात अघोरी प्रकार उघड

रक्षा विसर्जनावेळी काही अज्ञात व्यक्तींनी नारळ आणि इतर साहित्य वापरून अघोरी विधी केल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अशा अंधश्रद्धाजन्य कृतींमुळे परिसरातील वातावरण दूषित होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Hatkanangale Black Magic : यापूर्वीही घडले होते असे प्रकार

हातकणंगले परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अशा घटनांना पुन्हा प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Public Demand CCTV : कडक कारवाई आणि सीसीटीव्हीची मागणी

या पार्श्वभूमीवर संबंधित अघोरी प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच स्मशान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, नियमित देखरेख ठेवावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Hatkanangale Administrative Negligence : नगरपंचायतीवर निष्काळजीपणाचा आरोप

हातकणंगले नगरपंचायतीचा सगळाच कारभार हा अत्यंत ढिसाळ असल्याची तक्रार लोकांमधून सातत्याने केली जाते. कोणत्याही प्रश्नावर वेळकाढूपणा करणाऱ्या प्रशासनाने स्मशानातील या अशा अघोरी विद्या प्रकरणाकडेही दुर्लक्ष केल्याची तक्रार होत आहे. या आधी स्मशानात आणि गावातही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. स्मशानात वारंवार अशा घटना घडूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. ना सीसीटीव्ही बसवण्यात आले, ना सुरक्षेची कोणतीही यंत्रणा उभारण्यात आली.

या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास नागरिकांचा संताप अधिक वाढण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.