राजा रघुवंशी प्रकरणात 790 पानांचे आरोपपत्र; तरीही सोनम 11 महिन्यांनतर आली जेलमधून बाहेर; कुठे

शिलॉन्ग : देशभरात खळबळ उडवणाऱ्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आणि मृताची पत्नी सोनम रघुवंशीला (Sonam Raghuvanshi) तब्बल ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मेघालय पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, एका गंभीर चुकामुळे संपूर्ण प्रकरण कमकुवत झाल्याची बाब समोर आली आहे. शिलॉन्गमधील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी दशलेन आर. खारबेंग यांच्या न्यायालयात लीगल एड कमिटीमार्फत सोनमच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. चौथ्या सुनावणीत न्यायालयाने अचानक भूमिका बदलत अटकेच्या कागदपत्रांतील त्रुटी लक्षात घेत सोनमला जामीन मंजूर केला. न्यायालयाने तिला पुरावे व साक्षीदारांपासून दूर राहण्याचे तसेच शिलॉन्ग सोडू नये, अशी अट घातली आहे.(Sonam Raghuvanshi)

अटक मेमोमध्ये चुकीचे कलम लावण्यात आले

या प्रकरणात सर्वात मोठी चूक म्हणजे अटक मेमोमध्ये चुकीचे कलम लावण्यात आले. हत्या प्रकरणात बीएनएस कलम 103(1) लावणे अपेक्षित असताना, पोलिसांनी चुकून कलम 403(1) लागू केले, जे संपत्तीचा गैरवापर यासंदर्भात आहे. या गंभीर त्रुटीमुळे अटकेची कारणे स्पष्ट न दिल्याचे मानले गेले आणि आरोपीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे जामीन मंजूर करण्याचा मार्ग मोकळा झाला. तसेच, २ जून २०२५ रोजी गाझीपूर न्यायालयात सोनमला हजर करताना तिच्याकडे वकील कोण होता, याची माहिती पोलिसांकडे नव्हती. तिला कायदेशीर मदत मिळाल्याचा कोणताही पुरावा नसल्याने न्यायालयाने यालाही अधिकारांचे उल्लंघन मानले. पोलिसांनी ही चूक केवळ लिपिकीय असल्याचे सांगितले, मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.(Sonam Raghuvanshi)

सुनावणीतील विलंब याचाही फायदा सोनमला झाला

दरम्यान, ११ महिने कारावास आणि सुनावणीतील विलंब याचाही फायदा सोनमला झाला. तिच्या वकिलांनी अटक मेमो, इतर कागदपत्रे आणि केस डायरीतही चुकीची कलमे नमूद असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे जामीन मिळण्यास मदत झाली. या निर्णयानंतर इतर आरोपींनाही दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर तिला जामीन देण्यात आला असून, सोनमचे वडील देवी सिंह यांनी तो भरला. मात्र, जामीन मिळूनही सोनमला शिलॉन्गबाहेर जाण्यास मनाई आहे. इंदौरमध्ये या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत असून, मृत राजा रघुवंशीच्या भावाने हा निर्णय उच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. तर त्यांची आई या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करत आहे.

सोनम रघुवंशीला मुख्य सूत्रधार ठरवण्यात आले

दरम्यान, मेघालय पोलिसांनी या प्रकरणात ७९० पानी आरोपपत्र दाखल केले असून त्यात सोनम रघुवंशीला मुख्य सूत्रधार ठरवण्यात आले आहे. तिच्यासह प्रियकर राज सिंह कुशवाहा आणि इतर तीन आरोपी—आकाश सिंह राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी—यांचा कटात सहभाग असल्याचे नमूद आहे. आरोपपत्रानुसार, २३ मे रोजी सोहरा परिसरात विशाल चौहानने धारदार शस्त्राने राजावर पहिला प्राणघातक वार केला. त्या वेळी आकाश आणि आनंदही घटनास्थळी उपस्थित होते, तर सोनम जवळच उभी होती. पहिल्या वारानंतर राजा गंभीर जखमी झाला. त्यानंतर विशालने त्याच्यावर वारंवार हल्ला केला. राजा मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्व आरोपींनी मिळून मृतदेह दरीत फेकला.

यापूर्वी २१ मे रोजी गुवाहाटीतही हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र योग्य संधी न मिळाल्याने तो फसला. त्यानंतर मेघालयात हत्या करण्याचा प्लॅन आखण्यात आला. सोनम सतत फोनवरून सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत होती. हत्या घडवून आणण्यासाठी ठराविक भूमिका निश्चित करण्यात आल्या होत्या. सोनमने सेल्फीच्या बहाण्याने राजाला ठराविक ठिकाणी नेले आणि इशारा देताच विशालने हल्ला केला. आकाश दूरून नजर ठेवत होता, तर आनंद शस्त्रास्त्र आणि इतर व्यवस्थापनात सहभागी होता. सोनमचा प्रियकर राज कुशवाहा इंदौरमधून संपूर्ण कटाचे नियोजन करत होता.

पोलिसांनी आरोपपत्रात सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, भाड्याने घेतलेली स्कूटी आणि इतर पुरावे नमूद केले आहेत. मात्र, या सर्व असूनही तपासातील त्रुटींमुळे प्रकरणाला मोठा धक्का बसला असून, न्यायालयाच्या निर्णयामुळे या हाय-प्रोफाइल प्रकरणात नवे वळण आले आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.