मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच ‘आऊट’

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या (Vidhan parishad) 17 जांगासाठी निवडणुका होत असून महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (MVA) असाच सामन रंगला आहे. मात्र, काही मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवाराची डोकेदुखी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, भाजप प्रदेशाध्यक्षांनी आज बंडखोरांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तर, काही ठिकाणी अर्ज छाननी प्रक्रियेत उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्यामध्ये, अमरावतीत भाजप बंडखोर विप्लव बजोरिया यांचा अर्ज बाद झाला आहे. तर, सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झाल्याने महायुतीचा विजय सोपा झाला आहे. तसेच, नाशिकमध्ये महाविकास आघाडीने उमेदवारच दिला नाही. तर, आता यवतमाळमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारानेच चक्क अर्ज माघारी घेतला आहे.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील विधान परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे पारडे जड असून सर्वच मतदासंघात महायुतीचे संख्याबळ जास्त आहे. मात्र, महाविकास आघाडीनेही विजयाचा विश्वास व्यक्त करत उमेदवार दिले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने उद्या चित्र स्पष्ट होईल. मात्र, निवडणुकांपूर्वीच 4 मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवारांचा विजय सोपा झाल्याचं दिसून येत आहे.

सोलापूर

सोलापूरमध्ये भाजप महायुतीने राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीने काँग्रेसच्या आदित्य फत्तेपूरकरांना मैदानात उतरवले होते. मात्र, अर्ज छाननी प्रक्रियेत त्यांचा अर्ज बाद झाल्याने येथील महाविकास आघाडीचे प्रमुख उमेदवारच लढतीतून बाहेर पडले आहेत. आता, येथे महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देता ते पाहावे लागेल. याशिवाय, भाजप महायुतीला सोलापुरात मोठं संख्याबळही आहे. सोलापुरात विधानपरिषदेसाठी 614 मतदार असून भाजप महायुतीकडे 428 संख्याबळ आहे. तर, महाविकास आघाडीकडे केवळ 81 मतदार आहेत. त्यामुळे भाजपच्या राजेंद्र राऊत यांचा विजय सोपा झाला आहे.

यवतमाळ

यवतमाळमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून त्यांच्याच उमेदवाराने आपला अर्ज माघारी घेतला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी यवतमाळ विधानपरिषद निवडणूकीतून माघार घेतली. आपले संख्याबळ जुळत नसल्याने मी निवडणूकीतून माघार घेत असल्याचे कांबळे यांनी म्हटले. कॉग्रेसने मला तिकीट दिले, त्याबाबद्दल मी नेत्याचे आभार मानतो, असे म्हणत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. येथील मतदारसंघात महाविकास आघाडीकडे 446 मतदारांपैकी केवळ 131 मतदार असल्याने निवडणुकीच्या रिंगणातून त्यांनी माघार घेतली आहे.

अमरावती

अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रवीण पोटे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज भरला होता. मात्र, येथून भाजप कार्यकर्ते असलेल्या विप्लव बजोरिया यांनीच बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. मात्र, आज बजोरिया यांचा अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनीच विप्लव बाजोरिया यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांना बजोरिया यांचा अर्ज बाद केला. त्यामुळे, भाजप महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. याशिवाय येथे भाजप महायुतीकडे संख्याबळ अधिक आहे. अमरावतीत 449 पैकी भाजप महायुतीकडे 222 एवढं संख्याबळ आहे. तर, महाविकास आघाडीकडे 148 एवढेच संख्याबळ आहे. दरम्यान, विप्लव बजोरिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

नाशिक

नाशिक विधानपरिषद मतदारसंघात ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती. मात्र, शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आला नाही, त्यामुळे येथे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवारच नाही. आता, अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्यांपैकी कोणत्या नेत्याला महाविकास आघाडी पाठिंबा देते त्यावर येतील महायुतीच्या विरोधातील उमेदवार निश्चित होईल. सध्या नाशिकमध्ये 603 जागांपैकी भाजप महायुतीकडे 454 एवढं संख्याबळ असल्याने येथेही महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. येथे शिवसेना महायुतीचे नरेंद्र दराडे हे उमेदवार आहेत.

दरम्यान, या चारही मतदारसंघांचा विचार केल्यास भाजप महायुतीचे संख्याबळ आणि समोरील उमेदवारांची माघार लक्षात घेत येथे महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे.

हेही वाचा

शेतकरी कर्जमाफीसाठी कोण पात्र, कोण अपात्र, सरकारचे सर्व निकष सोप्या शब्दात!

आणखी वाचा

Comments are closed.