धक्कादायक! पुण्यात आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन;चिठ्ठीत कंपनीतील दोन महिलांचे नाव, हिंजवडी हादरल

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधील (Nashik) आयटी कंपनीतील धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर, आता पुण्याच्या आयटी हब हिंजवडीमधून (Pune) एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका 48 वर्षीय आयटी (IT) अभियंत्याने आत्महत्या केली आहे. अमित ब्राम्हे असं या अभियंत्याचं नाव आहे. या धक्कादायक प्रकरणी नामांकित आयटी कंपनीतील दोन वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील आयटी क्षेत्रात खळबळ उडवून देणारी ही घटना 2 जून रोजी घडली असून 48 वर्षीय आयटी अभियंता अमित ब्राम्हे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अमित यांच्या या टोकाच्या पावलामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, आत्महत्येपूर्वी अमित यांनी लिहिलेल्या दोन पानांच्या सुसाईड नोटने कंपनीतील अंतर्गत छळाची भीषणता समोर आणली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांची नावे स्पष्टपणे लिहिली आहेत. अमित ब्राम्हे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कंपनीतील वरिष्ठ सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक छळाचा पाढाच त्यांनी या नोटमध्ये वाचला आहे. चांगले प्रोजेक्ट्स काढून घेणे, जाणूनबुजून अत्यंत कठीण कामे देणे, इतर स्टाफसमोर वारंवार अपमान करणे आणि नोकरी सोडण्यासाठी सातत्याने दबाव टाकणे, असा छळ या दोन्ही महिला सहकाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप अमित यांनी केला आहे.

पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, याशिवाय, त्यांचा मित्र विनोद पालीचा देखील उल्लेख असून त्याने त्रास दिल्याचं म्हटलं आहे. विनोदने अमित यांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या आणि कंपनीत त्यांची बदनामी केली, असा उल्लेख या नोटमध्ये आढळला आहे. या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळूनच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचं अमित यांनी चिठ्ठीत म्हटलं. अमित ब्राम्हे यांच्या सुसाईड नोटच्या आधारे भोसरी पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसांकडून कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास वेगाने सुरू आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे आयटी क्षेत्रातील वाढता मानसिक तणाव, अंतर्गत राजकारण आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा

वैभवसंपन्न दगाबाज नेता म्हणजे जयंत पाटील; सदाभाऊ खोतांची बोचरी टीका, शक्तिपीठ महामार्ग आंदोलनावरही बोलले

Comments are closed.