पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? संदीप देशपांडें
जैन व्हाईट लाइनवर संदीप देशपांडे: पांढऱ्या पट्टीमुळे जमीन थंड राहते, हे विज्ञान इतकी वर्षे जैन समाजाला माहिती नव्हते का? आताच अचानक या विज्ञानाचा उगम कसा झाला?, असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांध्ये जैन मंदिरं (Jain Temple) आणि लोकवस्ती असलेल्या परिसरांमधील रस्त्यांवरील पांढऱ्या पट्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जैन साधू-साध्वींना चालण्यासाठी जैन समाजाकडून परस्पर रस्त्यांवर हे पांढरे पट्टे (White Line) मारण्यात आले होते. सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) याने याविरोधात आवाज उठवल्यानंतर अशाप्रकारे रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारणे, कितपत योग्य आहे, हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, या सगळ्यानंतर प्रसाद वेदपाठक याला धमकीचे फोन येऊ लागले होते. त्यामुळे प्रसाद वेदपाठक याने मनसेकडे (MNS) मदतीसाठी धाव घेतली होती. यानंतर मुंबईत जैन समाजाकडून रस्त्यांवर मारण्यात येणाऱ्या पांढऱ्या पट्टीविरोधात मनसेने आघाडी उघडली होती. त्यामुळे जैन आणि मराठी समाजात वादाचे प्रसंगही उद्भवले होते. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande news) यांनी जैन समाजाकडून मुंबईत सांस्कृतिक दहशतवाद पसरवला जात असल्याचा आरोप केला होता. (Jain White Line Controversy in Mumbai)
संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ‘बोल भिडू’ वेब पोर्टलला मुलाखत देताना म्हटले की, जैन समाजाला इतके वर्षे विज्ञान माहिती नव्हतं का? अचानक विज्ञानाचा उगम झाला का? पांढऱ्या पट्ट्या झाल्या की जमीन थंड होते, मग संपूर्ण रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या लावा ना. हे शक्य आहे का? उगीच धर्माच्या नावाखाली विज्ञानाच्या नावाखाली स्वत:चा सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करायचा असेल तर याला आमचा विरोध आहे. हा नुसता पट्ट्या मारण्याचा विषय नाही तर हा संघर्ष मराठी माणसाची मुंबई याविरुद्ध इतर लोक असा आहे. ‘ज्यांना वाटतं मुंबईवर आपला पगडा असावा, मुंबई आमची आहे’, ‘आम्ही मराठीत बोलणार नाही, हिंदीत बोललं तर काय होईल’, ‘इकडे मांसाहार करायचा नाही’, हा दहशतवाद करणाऱ्यांविरुद्धचा हा लढा आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
मनसे विरुद्ध जैन समाज : जैन समाजाचे युवा नेते संदीप देशपांडे यांचा इशारा
संदीप देशपांडे यांनी जैन समाजाच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर जैन मुनी निलेशचंद्र विजय आणि जैन नेते कुणाल जैन यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मराठी आणि जैन समाज अनेक वर्षे गुण्यागोविंदाने राहत आहे. मात्र, काही राजकारणी केवळ स्वत:चा राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जैन समाजा हा अहिंसा, शांतता आणि सह अस्तित्त्वावर विश्वास ठेवणारा आहे. एखादा स्थानिक मुद्दा असू शकतो, त्यावर चर्चा होऊ शकते. पण संपूर्ण जैन समाजाला लक्ष्य करुन धार्मिक रंग देणे अत्यंत चुकीचे आहे. संदीप देशपांडे वारंवार जैन धर्म, आमचे सण-उत्सव आणि साधू-संत यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरतात. ते आता सहन केले जाणार नाही. समाजातील मोठे नेते गप्प असतील, पण आता जैन समाजातील तरुण शांत बसणार नाहीत, असे कुणाल जैन यांनी म्हटले.
आणखी वाचा
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Comments are closed.