देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकवरुन पृथ्वीबाबांवर आरोपांच्या फैरी झाडल्या, पृथ्वीराज चव्हाणांचं

पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील (Mumbai-Pune Expressway) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पावर झालेल्या दुर्घटनेनंतर (Landslide) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत बोलताना विरोधकांवर निशाणा साधला होता आणि 2014 पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने हा प्रकल्प अशक्य असल्याचे सांगत त्याला स्थगिती दिल्याचा दावा केला होता. मुख्यमंत्र्यांच्या याच दाव्यावर आणि आरोपांवर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी अत्यंत खणखणीत उत्तर देत उलट मुख्यमंत्र्यांनाच धारेवर धरले आहे. ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सरकारमधील भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे.

Prithviraj Chavan & Devendra Fadnavis: प्रकल्पाची कल्पनाच आमची होती

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “वस्तुस्थिती काय ते लोकांना समजलं पाहिजे. अशी चर्चा चालली आहे की मी मिसिंग लिंकचं काम होऊ दिलं नाही, बंद केलं असं नव्हतं. या प्रकल्पाची कल्पनाच आमची होती. डिसेंबर 2013 मध्ये जेव्हा मी या प्रकल्पाला स्थगिती दिली तेव्हा मी सांगितलं होतं की सगळी कॅलक्युलेशन्स पुन्हा करा. सेफ्टी चेक करा, विंड टनेलसाठी अभ्यास करा, धोका नाही हे सांगा आणि किंमती पुन्हा एकदा तपासा कारण या किंमती बरोबर वाटत नाही.

मी मुख्यमंत्री असतानाच मिसिंग लिंकची कल्पना मांडली होती. आमचा विरोध असता तर कल्पनाच मांडली नसती. प्रकल्पाच्या अभ्यासालाही मंजुरी दिली होती. देशात अशा प्रकारचा टनेल झाला नव्हता कारण त्यामुळे मी सुरक्षा पुन्हा तपासा म्हणत स्थगिती दिली होती. पुढच्या काळात निकष पूर्ण झाले असं वाटतं. कारण देवेंद्र फडणवीस हेदेखील महाराष्ट्राच्या विकासाबद्दल काम करत आहेत याची मला खात्री आहे. माझी चिंता अशी आहे की स्ट्रक्चरल इंजनिअरिंगवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यांनी चांगलं काम केलं आहे. पण काम केल्यानंतर, डिझाईन केल्यानंतर कंत्राट कुणाला तरी द्यावं लागतं, त्यात भ्रष्टाचार झाला असेल आणि 40 टक्के कमिशनची प्रथा महाराष्ट्रात पडली आहे तसं घडलं असेल तर मग सिमेंटमध्ये किती वाळू घातली? कसं काम केलं? याचा तपास कुणी केला आहे का?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Prithviraj Chavan & Devendra Fadnavis: 40 टक्के कमिशन अन् 50-50 खोक्यांचे पैसे रस्त्यांच्या कंत्राटांतूनच

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, “मिसिंग लिंकला आक्षेप नाही तो व्हायलाच हवा होता. मिसिंग लिंकला माझा आक्षेप नाही. तो प्रकल्प व्हायलाच हवा होता, आता तो झाला आहे. किंमत वाढली आहे पण ठीक आहे, त्याचं ऑडिट आमचं सरकार आल्यावर आम्ही करु. पण या प्रकल्पाची गरज होती. पण 40 टक्के कमिशनचा विषय महाराष्ट्रात चालला आहे. आमदारांना विकत घेण्यासाठी 50-50 खोक्यांचा विषय महाराष्ट्रात आपण बोलतो.

खासदारांची किंमत किती आम्हाला माहीत नाही. हे सगळे पैसे येतात कुठून? तर रस्त्यांच्या कंत्रांटांमधूनच हे पैसे येतात, म्हणूनच तुम्हाला समृद्धी महामार्ग पाहिजे होता, आता तुम्हाला शक्तिपीठ महामार्ग हवा आहे. डिझाइनप्रमाणे किंवा ज्या दर्जाचं काम व्हायला हवं तसं झालं नाही आणि भ्रष्टाचार झाला तर हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशनच्या घोषणेवर गेलं. महाराष्ट्रात यापेक्षा वाईट अवस्था आहे. हे पैसे येतात कुठून? तर मुंबईतल्या बिल्डर लॉबीकडून आणि रस्त्यांच्या कंत्राटांमधून येतात,” असे देखील ते म्हणाले.

Prithviraj Chavan & Devendra Fadnavis: यूपीच्या 13 एक्सप्रेसवेपेक्षा समृद्धी महामार्ग 40 टक्के महाग

“सुरक्षेच्या बाबतीत तडजोड व्हायला नको, सकृत दर्शनी ती झालेली दिसते. डिझाइन चांगलं आहे, सरकारने मिसिंग केला त्याबद्दल अभिनंदन. पण कंत्राट देताना सरकारी अधिकारी, मंत्री, चपराशापर्यंत सगळं कसनं असतं ते आपल्याला माहीत आहे. खड्डे का पडले? दरड का कोसळली? हे प्रश्न आहेतच. रस्ता तयार केल्यानंतर खड्डे कुणी खोदत नाही. पण मुख्यमंत्र्यांना कदाचित जास्त माहिती असावी. त्यावेळी मी दिलेली मंजुरी आणि आत्ताची मंजुरी याच्या फाइल्स काढून पाहिल्या पाहिजेत. किंमती का वाढल्या ते लक्षात येईल.

एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर समृद्धी महामार्ग हा साधारण 705 किमीचा आहे. उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेशात 13 एक्स्प्रेस वे बांधले आहेत. या 13 एक्स्प्रेस वेंची किंमत, किती लेन, किती किमी ही सगळी माहिती उपलब्ध आहे ती काढली आणि समृद्धी महामार्गाची किंमत लक्षात घेतली तर जवळपास 35 ते 40 टक्के समृद्धीची किंमत जास्त आहे. उत्तर प्रदेशात सरकार भाजपाचं आहे, महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार आहे. ती पण एक अडचण आहेच, एका पक्षाचं सरकार आणि ट्रिपल इंजिन सरकार. प्रत्येक ठिकाणी तीन दारं पुजावी लागतात. महाराष्ट्रात मोठे उद्योग येत नाहीत याचं कारण तेच आहे पण सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करायला नको, ती तडजोड झालेली आहे असं सकृत दर्शनी वाटतं आहे,” अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ram Kadam on Raj Thackeray: राज ठाकरेंनी मिसिंग लिंकवरुन देवेंद्र फडणवीसांना फटकारताच राम कदमांचा पलटवार, म्हणाले, ‘हिंदीत बोललं तर काय झालं?’

Comments are closed.