टीम इंडियाचा पराभव होताच वैभव सूर्यवंशी भर मैदानात एकटा बसून रडू लागला; इंग्लंडविरुद्धच्या पाचव
वैभव सूर्यवंशी रडत आहे IND Vs ENG 5वी T20I : इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा दारुण पराभव झाल्यानंतर एक हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. अवघ्या 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी भारतीय संघाच्या पराभवानंतर भर मैदानातच भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. सामन्यानंतरचा त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीला प्रथमच भारतीय टी-20 संघात स्थान मिळालं होतं. त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र इंग्लंड दौरा त्याच्यासाठी निराशाजनक ठरला. सुरुवातीच्या तीन सामन्यांत त्याला अनुक्रमे 13, 14 आणि 15 धावाच करता आल्या. त्यामुळे मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात टीम मॅनेजमेंटने त्याला अंतिम अकरातून वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर सोशल मीडियावर संघ व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अनेक चाहत्यांनी युवा खेळाडूला अधिक संधी द्यायला हवी होती, अशी भूमिका घेतली.
वैभव सूर्यवंशी भर मैदानात एकटा बसून रडू लागला
पाचव्या सामन्यादरम्यान वैभव सूर्यवंशी डगआऊटजवळ आणि सीमेरेषेजवळ अत्यंत निराश बसलेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट जाणवत होती. मात्र सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा पराभव निश्चित होताच तो स्वतःला सावरू शकला नाही. इतर खेळाडू सामन्यानंतरच्या औपचारिकतेत व्यस्त असताना वैभव मात्र मैदानावरच बसून रडताना दिसला. त्याच्या डोळ्यांतील अश्रूंनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. या भावनिक क्षणाचा व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांकडून त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे.
वगळल्यानंतर वैभव सूर्यवंशी ज्या प्रकारे रडतोय, निराशेने एकटाच बसला आहे ते पहा. 💔
गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर यांनी घेतलेला हा कठोर निर्णय आहे. 🥹 pic.twitter.com/HbTn8Nxqrr
— सोनू (@Cricket_live247) 11 जुलै 2026
इंग्लंडने 4-0 ने मालिका जिंकली
इंग्लंड दौऱ्यातील टी-20 मालिका भारतासाठी अत्यंत निराशाजनक ठरली. पाच सामन्यांच्या मालिकेत एक सामना पावसामुळे रद्द झाला, तर उर्वरित चार सामने इंग्लंडने जिंकत भारताचा 4-0 असा धुव्वा उडवला. मालिकेतील अखेरच्या टी-20 सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. अनुभवी जोस बटलरने 64 चेंडूत 12 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 131 धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याला कर्णधार हॅरी ब्रूकची तितकीच दमदार साथ लाभली. ब्रूकने 45 चेंडूत नाबाद 95 धावा करत 8 षटकार आणि 4 चौकार ठोकले. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीमुळे इंग्लंडने 20 षटकांत 3 बाद 257 धावांचा डोंगर उभारला.
भारताची झुंज अपुरी
258 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुरुवातीपासूनच मोठे फटके बसले. ईशान किशनने 56 आणि तिलक वर्माने 53 धावांची झुंजार खेळी केली. मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. अखेर भारताने 20 षटकांत 8 बाद 201 धावांपर्यंतच मजल मारली आणि 56 धावांनी सामना गमावला. या पराभवासह भारताला मालिकेत 4-0 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.
हे ही वाचा –
Comments are closed.