‘मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते?’
देवेंद्र फडणवीसांवर रोहित पवार मुंबईत 23 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या 15 दिवसांच्या जमावबंदीच्या आदेशावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावरून थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सरकारला कसली भीती वाटतेय? तरुणाईला घाबरलात का?” असा थेट सवाल करत रोहित पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत २३ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान विविध कलमांतर्गत जमावबंदी लागू केली आहे. या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना परवानगीशिवाय एकत्र जमण्यास, मोर्चे काढण्यास किंवा सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. याच निर्णयावर आक्रमक होत रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत सरकारला धारेवर धरले.
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
२३ जुलै पासून ६ ऑगस्टपर्यंत मुंबईत ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास रोखणाऱ्या जमावबंदीचे आदेश लागू करण्याचं कारण काय? सरकारला कसली भीती वाटतेय? तरुणाईला घाबरलात का? तरुणाईचा आवाज दाबायचं ठरवलंच असेल तर केवळ ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी घोषित न करता…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 22 जुलै 2026
मग 2029 पर्यंत जमावबंदी किंवा कर्फ्यू घोषित करा
रोहित पवार यांनी फडणवीस यांना उद्देशून लिहिले की, “मा. देवेंद्र फडणवीस साहेब, 23 जुलै पासून 6 ऑगस्टपर्यंत मुंबईत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास रोखणाऱ्या जमावबंदीचे आदेश लागू करण्याचं कारण काय? सरकारला कसली भीती वाटतेय? तरुणाईला घाबरलात का? तरुणाईचा आवाज दाबायचं ठरवलंच असेल तर केवळ ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी घोषित न करता 2029 पर्यंत जमावबंदी किंवा कर्फ्यू घोषित करा, कारण त्यानंतर तरुणाईच तुमच्या सरकारला पायउतार करणार आहे.”
मुंबईत मोठं आंदोलन उभं राहणार?
दरम्यान, उद्धव ठाकरे मुंबईतून दिल्लीमध्ये पोहोचले आणि त्यांनी दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांचं मनोबल उंचावलं. या ठिकाणी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या संघर्षाला नमन करतच, “फक्त आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नको, तर या सरकारलाच घालवायला हवं,” अशी भावना व्यक्त केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज (22 जुलै) भेटीगाठी करताना आंदोलनाला योग्य दिशेनं नेण्यासाठी चर्चा केली. आज सकाळी त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी सुद्धा आंदोलनासंदर्भात चर्चा केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, “केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा सरकारकडून गांभीर्याने घेतला जात नसल्याने वेगळ्या रणनीतीची गरज निर्माण झाली आहे.” असे मत व्यक्त केले.
हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा
दुसरीकडे, राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी तयारी करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर ज्या पद्धतीने मोठं आंदोलन उभं राहिलं आहे, दिल्ली पोलिसांनी केलेल्या अत्याचारानंतरही विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकजुट दाखवत जंतर-मंतरवरती तळ ठोकला आहे त्या पद्धतीने आंदोलन उभं राहणार का? याकडे लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Comments are closed.