Nasrapur Case – ही घटना मानवतेवरील कायमचा कलंक; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला तीव्र संताप

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून माणुसकीला काळीमा फासरणारी घटना पुण्यात घडली आहे. ‘गायीचे वासरू दाखवतो’ असे सांगून भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका 65 वर्षांच्या नराधमाने अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर गोठ्यात नेऊन अत्याचार केला आणि दगडाने ठेचून तिचा खून केला. नराधम आरोपीने त्या चिमुरडीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला. ही घटना उघडकीस आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला.

सर्व राजकीय पक्ष आणि जनता नसरापूर घटनेविरोधात एकत्र येऊन घृणा, संताप आणि निषेध व्यक्त करत असली तरी अशा प्रकारच्या घटना समाजासाठी अत्यंत लाजिरवाण्या आहेत. ही घटना मानवतेवरील कायमचा कलंक आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा मुडदा पडला! 24 तासांत दोन चिमुरड्यांवर अत्याचार आणि हत्या, पुण्यात नसरापूर आणि चाकणमध्ये मन सुन्न करणाऱ्या घटना

सरकारने तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले, तरी केवळ शब्दांनी काही साध्य होणार नाही. ही कारवाई सर्वांच्या नजरेसमोर झाली पाहिजे; ती अत्यंत कठोर आणि जरब बसवणारी असली पाहिजे. तसेच, अशा प्रकारचा गुन्हा करण्याचा विचारही करणाऱ्या कोणाच्याही मनात या कारवाईमुळे कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच या घटनेमुळे आम्हा सर्वांमध्ये संताप खदखदत असून माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नसल्याचेही ते म्हणाले.

Comments are closed.