मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच फाईलवर सह्या; राज्यभरात संताप,मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

मुंबई : राज्याचे कर्तबगार नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. बारामती येथील विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर देशातील वरिष्ठ नेत्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला. मात्र, अजित दादांच्या अपघाती निधनादिवशीच मंत्रालयात अत्यंत लाजीरवाणी घटना घडल्याचं समोर आलं आहे. अजित दादांनी थांबवून ठेवलेल्या काही फाईल्सवर सुमारे 4 वाजताच्या सुमारास सह्या करण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. आता, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.

अजितदादांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विकास विभागाने 75 शाळांना परस्परपणे अल्पसंख्यांक दर्जाचे प्रमाणपत्र वाटप केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच, संबंधित प्रमाणपत्रास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थगिती देण्यात आली. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय अधिकार्‍याकडून करा आणि दोषींवर कारवाई करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

विरोधकांकडून तीव्र संताप

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दु:खवटा जाहीर केला होता. राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असतानाच अल्पसंख्याक विभागाकडून अवघ्या चार दिवसांत तब्बल 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही तीव्र संताप व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “हे नेमकं कोणाच्या इशाऱ्यावर केलं? याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत की अजून कोणी आहे, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. अजितदादा खमके व्यक्तिमत्त्व होते, प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती. त्यांच्या निधनातून सावरण्याआधीच असे कृत्य झाले असेल, तर याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे. दोषींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. टाळूवरचे लोणी खाणे ही म्हण इथे लागू पडते. त्यामुळे या घटनेचा आणि सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं.

स्थगिती असतानाही प्रमाणपत्रांची खिरापत

दरम्यान, मागील वर्षी ऑगस्टपासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांतच मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे, 28 जानेवारी रोजी दुपारी 3.09 वाजता अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीच पहिले प्रमाणपत्र देण्यात आले.

हेही वाचा

अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ

आणखी वाचा

Comments are closed.