चेन्नई सुपर किंग्सचा मराठमोळा ‘वाघ’ IPL 2026 मधून बाहेर; धोनीच्या लाडक्या आयुष म्हात्रेची एक्झि

आयुष म्हात्रे आयपीएल 2026 मधून बाहेर आयपीएल 2026 दरम्यान चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा स्टार फलंदाज आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. फ्रँचायझीने अधिकृतपणे ही माहिती जाहीर केली. आधीच खराब फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नईने 6 पैकी फक्त 2 सामने जिंकले असून 4 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.

फ्रँचायझीने सोशल मीडियावर दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “18 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना आयुष म्हात्रेच्या डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो आयपीएल 2026 च्या उर्वरित सामन्यांतून बाहेर राहणार आहे. आयुषला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी साधारण 6 ते 8 आठवड्यांच्या रिहॅबची आवश्यकता आहे.”

चेन्नईसाठी सर्वाधिक धावा

आयुष म्हात्रेने या हंगामात चेन्नईसाठी सहा लीग सामने खेळले असून, सहा डावांमध्ये 33.50 च्या सरासरीने आणि 177.87 च्या स्ट्राइक रेटने 201 धावा केल्या आहेत. या काळात त्याने दोन अर्धशतके झळकावली, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 होती. म्हात्रे आतापर्यंत चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज, संजू सॅमसन, 192 धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

आयुष म्हात्रेची आयपीएल कारकीर्द

आयुषने 2025 च्या आयपीएल हंगामात पदार्पण केले आणि दोन्ही हंगामात तो चेन्नई संघाचा भाग होता. या युवा सलामीवीराने आतापर्यंत स्पर्धेत 13 सामने खेळले आहेत. 13 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 33.92 च्या सरासरीने आणि 183.75 च्या स्ट्राइक रेटने 441 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 अर्धशतके झळकावली असून, त्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 94 धावा होती.

चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार?

आता, प्लेऑफच्या समीकरणाबद्दल बोलायचे झाल्यास, मागील अनुभव आणि आकडेवारीनुसार, या दहा संघांच्या स्पर्धेत 16 गुण मिळवणाऱ्या संघाला प्लेऑफमधील स्थान मिळण्याची खात्री असते. जरी काही संघ 14 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरले असले, तरी तिथे नेट रन रेट महत्त्वाची भूमिका बजावतो.

सीएसकेने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत आणि 2 जिंकले आहेत. त्यामुळे त्याचे 4 गुण आहेत. आता सीएसकेचे अजून 8 सामने बाकी आहेत. 16 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना त्यांच्या उर्वरित नऊ सामन्यांपैकी किमान 6 सामने जिंकावे लागतील. पण, येथून स्थान मिळण्याची खात्री नाही. मात्र, जर संघाने त्यांच्या उर्वरित 8 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले, तर त्यांचे एकूण गुण 18 होतील, जे पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुरेसे आहेत.

हे ही वाचा –

India Squad vs AFG Test : टीम इंडियातून दिग्गजांना डच्चू की विश्रांती?, अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीपूर्वी BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमकं काय चाललंय?

आणखी वाचा

Comments are closed.