अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा


बीड: राज्यातील बहुतांश जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी शांततेत मतदान पार पडले. मात्र, बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई येथे अमरसिंह पंडित आणि पवार यांच्या समर्थकांमध्ये वाद उफाळल्याचं पाहायला मिळालं. गेवराईतील राड्यात जखमी झालेले माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांनी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातून एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. यावेळी, गेवराई येथे मतदानादिवाशी (Election) झालेल्या राड्याबाबत त्यांनी सखोलपणे भाष्य करत भाजप नेते आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत खळबळजनक दावा केला आहे.

नगरपालिका निवडणुकी दरम्यान गेवराईमध्ये पंडित विरुद्ध पवार हा संघर्ष पाहायला मिळाला. गेवराई येथील निवडणुकीदरम्यान पवार आणि पंडित कुटुंबातील सदस्य एकमेकांना भिडले. त्यातून मतदानच्या दिवशी मोठा वाद उफाळून आला. या घटनेत माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांना जबर मारहाण झाली. सध्या त्यांच्यावर बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान एबीपी माझाशी बोलताना डावखर यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट पवार कुटुंबाने रचल्याचा खळबळ जनक दावा केला आहे.

गेवराईमध्ये मारहाणीची घटना ज्यावेळेस घडली, त्यावेळी मी गेवराईमधील कार्यालयात होतो. याच दरम्यान माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे भाऊ बाळराजे पवार यांच्यासह पाच ते सहा जण तिथे आले, ते सर्वजण अमरसिंह पंडित यांच्या खुनाच्या इराद्याने तिथे आले होते. गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांच्यासोबत होते, त्यांची गाडी त्यांनी थेट आमच्या कार्यालयावर आदळली. त्यानंतर, तिथे आल्यानंतर अमरसिंह पंडित यांना संपवून टाकायचं असे त्यांनी म्हटलं, ते नाहीत म्हणून मला संपवून टाकू असेही त्यांनी म्हटल्याचा खळबळजनक आरोप डावखर यांनी केला आहे. तसेच, काठी, बेल्ट, लाथ्या, बुक्याने मला मारहाण केली, असेही त्यांनी सांगितले.

पवारांनी 1997 मध्ये तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुखाचा खून केला होता, याच प्रकरणात त्यांनी 14 वर्षे तुरुंगात शिक्षा भोगली, सध्या शिक्षा भोगून ते बाहेर आले आहेत. बाहेर आल्यानंतर त्यांचे वर्तन गैर आहे, काल मला बचाव करण्याची संधी दिली नाही. मला त्यांनी जिवंत मारलं असते, पण आमचा ड्रायव्हर मध्ये आला. आणखी इतर काही जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस जबाब घेतील, या लोकांची जागा कारागृहात आहे. माझा संबंध नसताना मला मारहाण करण्यात आली, केवळ मतदान केंद्रावर बाचाबाची झाली आणि हा वाद उफाळून आल्याची माहिती अमृत डावखर यांनी दिली.

गेवराईत 55 जणांवर गुन्हा दाखल

बीडच्या गेवराई नगरपालिका निवडणुकी दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राडा प्रकरणात गेवराई पोलिसांनी 55 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. नगरपालिका मतदान प्रक्रिये दरम्यान विद्यमान आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांमध्ये भिडले होते. त्यामुळे गेवराई शहरात मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकरणात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत 55 जणांविरोधात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमांचा उल्लंघन केल्याप्रकरणी बीएनएस 163 223 189 इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये पवार आणि पंडित कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे आणखी काही व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सध्या गेवराई पोलीस ठाण्यात सुरू आहे.

हेही वाचा

17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली; आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही दोन टप्प्यात होण्याची शक्यता

आणखी वाचा

Comments are closed.