बीडमध्ये आतापर्यंत 22 खून झाले, पोलिसांना आडनाव लावता येत नाही हे दुर्दैवी; धनंजय मुंडेंची खंत

बीड : विलास घुले प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी बाहेर का ठेवलंय? त्याला अटक करण्यासाठी पोलीस का धजावत नाहीत? तो पोलिसांचा लाडका आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली. केजमधील विलास घुले हत्या प्रकरणी (Vilas Ghule Case) त्यांनी घुले कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेतली. तसेच या प्रकरणातील खरा आरोपी बाहेर असून त्याला पोलिसांनी पकडावं अशी मागणी केली.

विलास घुले यांच्या कुटुंबीयांनी सांगितलेल्या परिस्थितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडावं. काही लोकांनी ठरवून येऊन घुलेंच्या हॉटेलमध्ये उमेश माने या एसटी समाजाच्या तरुणाला मारहाण केली. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुलेची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी नऊ आरोपी अटक केली आहे. परंतु पोलिसांनी अजून एका आरोपीला अटक का केली नाही? त्याची वेगळी तपासणी का सुरू आहे? जे काही पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी त्याला बाहेर ठेवण्यात आले आहेत का?

आमची वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, जाती-पातीचा विषय नाही. जो आरोपी बाहेर आहे त्याने जर पुरावे नष्ट केले तर या प्रकरणातून काय बाहेर येईल? आमचा पोलिसांवर संशय आहे, त्यांना या प्रकरणातून एका आरोपीला वाचवायचं आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

पोलिसांना आडनाव लावता येत नाही हे बीडचं दुर्दैव

एका गुन्ह्यात एकाला एक न्याय, आणि दुसऱ्याला एक न्याय हे चालणार नाही. आतापर्यंत या बीड जिल्ह्यात 22 खून झालेत. या जिल्ह्यात काम करणाऱ्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला आडनाव लावायचा अधिकार नाही. देशभरातील कोणत्याही जिल्ह्यात नसेल तर बीड जिल्ह्यात आहे, हे दुर्दैव आहे.

आम्ही पूर्णपणे सामाजिक सलोखा जपून, कुणाचंही मन न दुखावता काम करतोय, असं धनंजय मुंडे म्हणाले. मारायला दाखवायचा एकाला आणि खून करायचा दुसऱ्याचाच, असं या प्रकरणात घडल आहे. अधिवेशनात मी स्वतः या मुद्द्यावर सभागृहात आवाज उठवला. न्याय हा सगळ्यांना सारखाच असला पाहिजे. तो मिळावा म्हणून पुन्हा एकदा सदनामध्ये हा विषय उठवणार आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

एसआयटीकडून तपास सुरू

बीडच्या केजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये दोन गटात भांडणाला सुरुवात झाली. या भांडणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेलचे मालक विलास घुले यांच्यावरच धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.

दरम्यान या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. आयपीएस वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला असून तपासाला सुरुवात झाली आहे. तसंच या प्रकरणातील सर्व 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

उमेश माने या युवकाचे प्राण वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुले याचा नऊ जणांनी चाकूचे वार करून हत्या केला होता. आता उमेश माने यांच्या तक्रारीवरुन 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

बजरंग सोनावणेंच्या मुलावर आरोप?

दरम्यान विलास घुले यांच्या हत्येमुळे जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेत आता खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवनेंवर आरोप करण्यात आला आहे. सौरभ बजरंग सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृत विलास घुले यांच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान आपल्यावरील सर्व आरोप सोनवणेंनी फेटाळले आहेत. हवं तर माझे कॉल रेकॉर्डिंग तपासा असंही सोनवणेंनी म्हटलं आहे.

ही बातमी वाचा:

Comments are closed.