देवेंद्र फडणवीसांवर केंद्रात मोठी जबाबदारी? कुणाला भेटले, काय चर्चा… दिल्ली दौऱ्यात गुप्तता

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा झाला. दिल्लीत झालेल्या या घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही हालचालींना वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले. त्यामध्ये त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं कुणाची भेट घेतली, कुणाशी चर्चा केली याबाबत मात्र कमालीची गुप्तता बाळगण्यात आल्याचं दिसतंय.

सीजेपीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा पूर्वनियोजित असल्याचं सांगण्यात आलं. दिल्लीमध्ये फडणवीसांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या भेटीत नेमकं काय झालं याबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली.

देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या एका दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना संधी मिळू शकते असं संजय राऊतांनी म्हटलं. त्यामुळे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामागचं नेमकं कारण काय, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा स्वीकारला

ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांच्यासमोरच केंद्र सरकारला झुकावं लागलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यामुळे गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे.

नीट पेपरफुटी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीसह देशभरातील विद्यार्थ्यांनी केली होती. या आंदोलनाचं लोण फक्त दिल्लीपर्यंत मर्यादीत राहिलं नाही तर ते संपूर्ण देशात पसरलं. त्यामुळे  सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात एखाद्या जनआंदोलनामुळे थेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर सीजेपी आणि सरकारमध्ये बैठक पार पडली. सीजेपीच्या अन्य प्रमुख मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली आणि उर्वरित 3 मागण्यादेखील सरकारने मान्य केल्याचं त्यांनी संय़ुक्त पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

ही बातमी वाचा:

Comments are closed.