गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
जळगाव: जिल्ह्याीतल पाचोरा (Jalgaon) शहरात भाजपाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजपही स्वबळावर लढेल, असे महाजन यांनी म्हटले. भाजपमधील वरिष्ठ आणि रणनीतीकार पॅनेलमधील नेते असल्याने महाजन यांच्या वक्तव्याने आता जळगावात महायुती (Mahayuti) फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना शिंदे गटाचे “आमदार किशोर पाटील यांनी चर्चेची दारे बंद केली. मग आम्ही त्यांच्या मागे फिरायचे का?… त्यांना मस्का लावायचा का?, भाजप हा मजबूत पक्ष आहे,” असे म्हणत महाजन यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. अवघ्या काही दिवसांपूर्वी आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर गद्दारीचा आरोप करत स्वबळाचा नारा दिला होता.
भाजपने माझ्याविरुद्ध निवडणूक लढणाऱ्या किंवा माझ्या विरोधातील सर्वांना प्रवेश दिला असल्याचे म्हणत स्वबळावर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका लढवण्याची घोषणा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार किशोर पाटील यांनी केली होती. त्यानंतर, आमदार मंगेश चव्हाण यांनीही भाजप स्वबळावर लढेल, असे सांगितले होते. किशोर पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. “आम्ही भाजपमध्ये शरद पवार गट आणि शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला आहे. पण, मित्रपक्षातील कुणालाही घेतलेलं नाही. पाचोरा भडगाव येथे राज्यात महायुतीतच लढायचे हे आमचे धोरण आहे, परंतु जिथे शक्य नाही, टोकाचे वाद आहेत, अशा काही ठिकाणी अपवादत्मक स्थितीत स्वबळावर लढावे लागेल.”, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
कोकणातही नितेश राणेंकडून स्वबळाचा नारा
दरम्यान, शिवसेना आणि भाजपामध्ये पाचोरा परिसरात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असून, जळगाव जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे. तसेच, राज्यातील आणखी काही जिल्ह्यात अशीच परिस्थिती असून सोलापुरातही भाजप नेतेच पक्षांतराला विरोध करत आहेत. तर, कोकणातही मंत्री नितेश राणेंनी स्वबळाचा नारा देत सिंधुदुर्ग गडावरुन रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे, निवडणुकांची घोषणा होताच, राजकीय पक्षाचे नेते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
हेही वाचा
ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
आणखी वाचा
Comments are closed.