संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासाठी वेगवेगळा न्याय, टीम इंडियाच्या खेळाडूकडून ‘गंभीर’ सवाल
नवी दिल्ली : टीम इंडियानं झिम्बाब्वे विरोधातील टी 20 मालिका 3-0 अशी जिंकली. या मालिकेत भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा अपयशी ठरला. तीन सामन्यांमध्ये शर्मानं अनुक्रमे 01,08 आणि 02 धावा केल्या. अभिषेक शर्मा अपयशी ठरल्यानंतर भारताचा क्रिकेटपटू हनुमा विहारीनं प्रश्न उपस्थित केले आहेत. अभिषेक शर्मा अपयशी ठरुन त्याला समर्थन दिलं जातं आणि संजू सॅमसनसाठी वेगळे निकष लावले जातात, असं विहारीनं म्हटलं.
हनुमा विहारचे गंभीर प्रश्न
हनुमा विहारीच्या मते 2026 च्या टी 20 वर्ल्ड कप पूर्वी संजू सॅमसन काही सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता त्यावेळी त्याला प्लेईंग 11 मधून बाहेर काढण्यात आलं. दुसरीकडे अभिषेक शर्मा अपयशी ठरल्यानंतर त्याला संधी दिली जातेय. हनुमा विहारी त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला की वर्ल्ड कप पूर्वी 5 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी न केल्यानं संजू सॅमसनची प्लेईंग 11 मधील जागा गेली होती. संजूला नंतर संधी मिळाली आणि तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला. त्या स्पर्धेत अभिषेक शर्मानं किती धावा केल्या? असा सवाल हनुमा विहारीनं केला.
इंग्लंड दौऱ्यातील अभिषेक शर्माच्या कामगिरीवर देखील हनुमा विहारीनं मत व्यक्त केलं आहे. इंग्लंड विरोधातील मालिकेत एका अर्धशतकाशिवाय त्यानं मोठी धावसंख्या केली नाही. 20, 30 धावा देखील करु शकला नाही. गेल्या 6 सामन्या एक अर्धशतक केलं आहे, यात वर्ल्ड कप जोडल्यास गेल्या 18 सामन्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
हनुमा विहारी म्हणाला की वर्ल्ड कपमध्ये सलग तीन अर्धशतकं करुन देखील संजू सॅमसनला वैभव सूर्यवंशीसाठी संघातून बाहेर काढण्यात आलं. संजू सॅमसननं टी 20 वर्ल्ड कपमध्ये किती सामने खेळले तर 3 सामने खेळले, त्या सर्व सामन्यांमध्ये त्यानं अर्धशतक केलं. अभिषेक शर्माची पाच सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या 16 धावा होती. कोणीही या संदर्भात बोलत नाही. जेव्हा संजू सॅमसनचा विषय येतो त्यावेळी धावा करण्यामध्ये सातत्य नसल्याचंं कारण दिलं जातं, ते ठीक आहे पण हाय प्रेशर असलेल्या सामन्यांमध्ये तो विजय मिळवून देऊ शकतो, असं हनुमा विहारीनं म्हटलं.
Comments are closed.