वैभव सूर्यवंशीबाबत कपिल देव यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष, म्हणाले…
सध्या आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशी हे नाव चर्चेचा विषय आहे. वैभव सूर्यवंशी अनेक विक्रमी खेळी करत सर्वांचं आपल्या फलंदाजीने लक्ष वेधून घेतलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीचा दबदबा राखणाऱ्या गोलंदाजांविरूद्ध वैभव सूर्यवंशीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आहे. पण वैभव सूर्यवंशीबाबत विचारताच भारताचे पहिले वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव यांनी वक्तव्य करण्यास नकार दिला आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं.
राजस्थान रॉयल्सचा हा सलामीवीर फलंदाज आयपीएल २०२६ मध्ये जबरदस्त कामगिरी करत असून, १० सामन्यांत ४०४ धावा केल्या आहेत. २३७.६४ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना त्याने ३७ षटकार आणि ३५ चौकार ठोकले आहेत. डावखुऱ्या या फलंदाजाने अनेक अव्वल गोलंदाजांवर मोठे फटके मारत आंतरराष्ट्रीय स्तरासाठी आपण तयार असल्याचे संकेत दिले आहेत. तरीही या सर्व चर्चांदरम्यान कपिल देव यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
“मला माहित नाही आणि मी काही सांगू शकत नाही, कारण मी त्याला नीट खेळताना पाहिलेलं नाही. मी तुमच्यासारखाच आहे, टीव्हीवर जे दाखवलं जातं तेच पाहतो आणि त्यातून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मी घरी बसून टीव्हीवर क्रिकेट पाहतो, त्यामुळे त्यावर अंतिम मत देणं योग्य नाही. जे लोक प्रत्येक खेळाडूला जवळून पाहतात आणि विश्लेषण करतात, तेच अधिक चांगलं सांगू शकतात, जसं सुनील गावस्कर, रवी शास्त्री किंवा हर्षा भोगले नीट सांगतली,” असं कपिल देव यांनी सांगितलं.
वैभव सूर्यवंशीने सर्वप्रथम अंडर-१९ क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली. २०२५ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि त्या हंगामातच तो घराघरात पोहोचला. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवला आणि तो जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा तो चर्चेत राहिला. वैभव सूर्यवंशीने यंदाच्या आयपीएलमध्ये सलग ३ वेळा १५ चेंडूत अर्धशतक करण्याचा करिष्मा केला. याशिवाय पुन्हा यंदाच्या आयपीएलमध्येही त्याने शतक झळकावलं. वैभवची प्रत्येक सामन्यातील कामगिरी पाहता त्याला लवकरात लवकर भारताच्या वरिष्ठ संघात संधी देण्याची मागणी केली जात आहे.
अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्याने १७५ धावांची तुफानी खेळी केली, ज्यामुळे भारताने ४११ धावांचा मोठा डोंगर उभा केला. त्यानंतर भारताने इंग्लंडवर तब्बल १०० धावांनी विजय मिळवला. हा फॉर्म त्याने आयपीएलमध्येही कायम ठेवला असून, तो सध्या ऑरेंज कॅपसाठी प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो बिहारकडून खेळतो.
Comments are closed.