‘कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि पे सीएमच्या घोषणेवर गेलं, राज्यात त्यापेक्षा भयानक स्थिती’

देवेंद्र फडणवीसांवर पृथ्वीराज चव्हाण कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि ‘पे सीएम’ (Pay CM) च्या एका घोषणेवर गेलं. महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती आहे. आमदारांच्या घोडाबाजाराबद्दल काय-काय चाललंय? हे कुठून येतात पैसे? आणि सर्वात सोपा मार्ग, एक तर मुंबईच्या बिल्डर कम्युनिटीकडून, पण त्यापेक्षाही सोपा मार्ग रोड काँट्रॅक्ट्समधून येतो, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मिसिंग लिंकबाबत त्यांनी सांगितले की, डिझाईन चांगलं आहे, याची गरज आहे, करणं गरजेचं होतं. सरकारने पुढे जाऊन हे केलं, अभिनंदन त्यांचं. पण काँट्रॅक्ट देताना, काँट्रॅक्टच्या किंमती ठरवताना त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचं काय? पॉलिटिकल लीडर्सचं काय? अगदी चपराशापर्यंत काय-काय होतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याची मला चिंता आहे आणि ते आपल्याला या पावसाळ्यामध्ये दिसतंय, रस्त्यात खड्डे पडलेले आहेत, का पडले? असे ते म्हणाले.

या प्रकल्पाची कल्पनाच आमची होती

बीबीसी मराठीशी बोलताना पृथ्वीराज म्हणाले की, मिसिंग लिंक प्रकल्पाची कल्पना आमचीच होती. त्यांनी सांगितले की, “चर्चा चालली आहे की मी बंद केला, होऊ दिलं नाही काम, असं नव्हतं. कारण मुळातच आम्ही, या प्रकल्पाची कल्पनाच आमची होती. त्यामुळे होऊ नये असं नव्हतं. मी 2013 च्या डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा प्रकल्पाला स्थगिती दिली, तेव्हा सांगितलं की याचे कॅल्क्युलेशन्स पुन्हा करा, सेफ्टी चेक पुन्हा करा, आणखी स्टडीज करा, अशा प्रकारचा टनेल देशात अजूनपर्यंत झाला नव्हता, त्यामुळे चिंता होती.”

हे सगळे पैसे रोड कॉन्ट्रॅक्ट्समधून येतात

कामाच्या दर्जावर आणि भ्रष्टाचारावर चिंता व्यक्त करताना म्हणाले, “माझा डिझाईनला आक्षेप नाही, माझा प्रकल्प करण्याबद्दल आक्षेप नाही. किंमत वाढली, ठीक आहे. परंतु, जर 40 टक्के कमिशनचा विषय जो चालला आहे, आमदार खरेदी करण्यासाठी 50-50 खोक्यांचा विषय आपण महाराष्ट्रात बोलत आहोत. हे कुठून येतात पैसे? हे सगळे पैसे रोड कॉन्ट्रॅक्ट्समधून येतात, असे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाची तुलना जर उत्तर प्रदेशच्या 13 एक्सप्रेसवेशी केली आणि एका लेन किलोमीटरची किंमत काढली, तर जवळपास 35 ते 40 टक्के किंमत आपल्या समृद्धी महामार्गाची जास्त असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पावसामुळे रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांवर बोलताना ते म्हणाले की, हळूहळू मान्सूनचे तास कमी-कमी व्हायला लागले आहेत, हा हवामान बदल आहे. त्याचा जर तुम्ही अभ्यास नसता केला, तर मग फारच दुर्दैवी म्हणावं लागेल, असे त्यांनी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.