बंगळुरू सलग दुसऱ्यांदा IPL चॅम्पियन! नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात हरलं, कर्णधार रजत पाटीदारने

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स अंतिम आयपीएल 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात आरसीबीने गुजरातचा त्यांच्याच घरच्या मैदानावर दारुण पराभव केला. या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला तो आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली, ज्याने फायनल सामन्यात अर्धशतक ठोकले. तर कर्णधार रजत पाटीदारने आपल्या नेतृत्वाखाली संघाला सलग दुसरे विजेतेपद मिळवून देत इतिहास रचला.

पाटीदारची ‘धोनी-रोहित’च्या क्लबमध्ये एन्ट्री (RCB Champions IPL 2026)

या विजयासोबतच आरसीबीने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा पराक्रम केला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनंतर सलग दोन आयपीएल ट्रॉफी जिंकणारा आरसीबी हा फक्त तिसरा संघ ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एम.एस. धोनी (CSK) आणि रोहित शर्मा (MI) या दिग्गज कर्णधारांनाच आपल्या संघाला सलग दोनदा विजेतेपद मिळवून देता आले होते. आता या एलिट क्लबमध्ये आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारचा समावेश झाला आहे.

सलग दोन आयपीएल ट्रॉफी जिंकून रजत पाटीदारने क्रिकेट जगतात स्वतःचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. आरसीबीच्या या बॅक-टू-बॅक विजयामुळे देशभरातील आरसीबीच्या चाहत्यांमध्ये (RCB Fans) आनंदाचे वातावरण आहे.

वॉशिंग्टन सुंदर एकटा पडला अन् गुजरात तेथेच हरला…. (RCB vs GT IPL 2026 Final)

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीच्या धारदार गोलंदाजीसमोर गुजरात टायटन्सची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. निर्धारित 20 षटकांत गुजरातला 8 बाद फक्त 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. वॉशिंग्टन सुंदरने 37 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शुभमन गिल 10 धावांवर, साई सुदर्शन 12 धावांवर आणि जोस बटलर 19 धावांवर बाद झाले. आरसीबीकडून रसिक दर सलामने तीन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

आरसीबीची झंझावाती फलंदाजी

156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत आरसीबीने अवघ्या 18 षटकांत 5 बाद 156 धावा करत सामना पाच गडी राखून सहज खिशात घातला. चेज मास्टर विराट कोहली शेवटपर्यंत नाबाद राहिला. कोहलीने 42 चेंडूंमध्ये नाबाद 75 धावा केल्या. विराट कोहलीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आरसीबीने 12 चेंडू राखूनच विजयावर शिक्कामोर्तब केले.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi IPL Orange Cap Winner : 16 सामने, 776 धावा! ज्या वयात मुलं बोर्डाची परीक्षा देतात, त्या वयात वैभव सूर्यवंशीने IPLमध्ये ऑरेंज कॅपवर नाव कोरलं

आणखी वाचा

Comments are closed.