शरद पवारांच्या पक्षातून 8 महिन्यांपूर्वी निवडून आलेला आमदार, पण निष्ठा शिंदे अन् अजितदादांकडे
शरद पवारचे आमदार राजू खरे: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका होऊन केवळ 8 महिने उलटले आहेत. या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीला जवळपास 230 जागा मिळाल्या, तर विरोधकांना फक्त 50 जागांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्यांचा पराभव झाला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे बडे नेते देखील पराभूत झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागा निवडून आल्या आहेत. त्यातही शरद पवारांना केवळ सोलापूर जिल्ह्यानेच साथ दिल्याचं पाहायला मिळालंय. शरद पवारांचे 10 पैकी 4 आमदार हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यातीलच सोलापुरातील मोहोळचे आमदार राजू खरे … राजू खरे 8 महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या पक्षातून निवडून आले. मात्र, राजू खरे हे शरद पवारांचा पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक साधताना दिसले आहेत.
राजू खरे हे सोलापुरातील मोहोळचे आमदार आहेत. मात्र, निवडणुका झाल्यानंतर काही दिवसांतच “मी नावालाच तुतारीवाला आहे, मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली”, असं वक्तव्य राजू खरे यांनी केलं. इतकंच नाही, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंच्या अनेक कार्यक्रमात राजू खरे यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. एवढचं नाही तर मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाचा मूहुर्त देखील काढला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर राजू खरे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असं भरत गोगावले म्हणाले होते. आता राजू खरे यांनी वर्तमानपत्रात एक जाहिरात दिली आहे. यामध्ये राजू खरे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) यांचे अभिनंदन केले आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. यापूर्वी देखील राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी स्थानिक दैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाहिराती दिल्या होत्या. राजू खरे यांनी शिवजयंतीनिमित्त शिंदे सेनेचे भरत गोगावले यांना कार्यक्रमाला बोलावले होते.
मोहोळ हा राखीव मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजन पाटील यांचं वर्चस्व असलेला मतदारसंघ मानला जायचा. त्यामुळे राजन पाटील ज्याच्या मागे उभे राहतील तोच मोहोळचा आमदार होतो, असं म्हटलं जायचं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजन पाटील याचे विश्वासू मानले जाणारे यशवंत माने निवडून आले होते. मात्र,राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राजन पाटील आणि यशवंत माने दोघांनीही अजितदादांची साथ दिली. त्यामुळे राजन पाटलांवर मतदारसंघातील मोठा वर्ग नाराज झाला होता. त्यातच अनगरमधील तहसील कार्यालयाचा मुद्दाही विधानसभा निवडणुकीत गाजला. 8 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी साथ दिलेल्या यशवंत मानेंना उमेदवारी दिली. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुरुवातीला रमेश कदम यांच्या कन्येला उमेदवारी दिली होती. मात्र, रमेश कदम तुरुंगात जाऊन आलेले भ्रष्टाचारी नेते असल्याची टीका विरोधकांकडून सुरु झाली. त्यामुळे शरद पवारांनी रमेश कदमांच्या मुलीला दिलेली उमेदवारी मागे घेतली आणि राजू खरे यांना दिली होती. शिवाय विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी सोलापुरात जाऊन “यांना असं पाडा की महाराष्ट्रभर संदेश गेला पाहिजे, सगळ्यांचा नाद करायचा; शरद पवारांचा नाही” असं आक्रमक भाषण केलं. त्यामुळे राजन पाटलांचा वर्चस्व असलेल्या मतदारसंघात राजू खरे निवडून देखील आले. मात्र, निवडून आल्यानंतर राजू खरे स्वत:च्या पक्षातील नेत्यांशी कमी संपर्कात असतात. ते सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या जास्त संपर्कात असलेले पाहायला मिळाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.