दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही बोलले
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील महायुतीच्या वादाची ठिगणी भडका बनल्याचं राज्य मंत्रिमंडळ बैठकीवेळी दिसून आलं. महायुतीमधील शिवसेना मंत्र्यांनी चक्क कॅबिनेट बैठकीला दांडी मारुन आपला पवित्रा दाखवून दिला. त्यानंतर, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मराठीni (एकनाथ शिंदे) काही मंत्र्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत महायुतीमधील (mahayuti) तणाव आणि नेते, पदाधिकारी, पक्षप्रवेश या मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, एकनाथ शिंदे एवढ्यावरच थांबले असून थेट दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. एकनाथ शिंदेंनी दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते तथा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची तक्रार केली. त्यामध्ये, प्रामुख्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर त्यांचा रोख दिसून आल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ शिदेंनी अमित शाहांच्या बैठकीनंतर बोलताना म्हटले, मी रडणारा नाही, तर लढणारा आहे.
एकनाथ शिंदेंनी आज सायंकाळी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकांच्या वादाची माहिती दिली. महायुतीमध्ये असलेल्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर भाष्य करत काहीही खंत व्यक्त केली. ऑपरेशन लोटससाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे पैसे देऊन आमचे नेते फोडले जात असल्याची तक्रारही शाहांपुढे करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीनंतर एकनाथ शिंदे बिहारमध्ये शपथविधी सोहळ्यासाठी जाणार असल्याचे समजते.
अमित शाहांच्या भेटीनंतर काय म्हणाले एकनाथ शिंदेंनी
बिहार निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करावे म्हणून मी अमित शाहांना भेटलो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तसेच, मी तक्रारीचा पाढा वाचणारा नसून मी रडणारा नाही तर लढणारा आहे. राज्यातील छोटे-मोटे वाद आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसते, अशी प्रतिक्रिया राज्यातील महायुतीच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली. तसेच, मी आतमध्ये बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सूरु आहेत, तुम्ही पतंग उडवता. महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे, हा राज्यातला विषय होता. हा विषय दिल्लीत नव्हताच, असेही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंनी बैठकीत कोणते मुद्दे मांडले
विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. मात्र, काही नेते ते वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळतंय. मीडीयात नाहक उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे जनमानसात उगाचच संभ्रम निर्माण होत आहे, अशी खंत आणि तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांपुढे मांडली.
महायुतीमधील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे, युतीच्या विजयी घोडदौडीत विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारतां येत नाही. काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत, त्यांच्याकडून अशा पद्धतीने काम यापुढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असे मुद्दे एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यापुढे दिल्ली भेटीत मांडले.
मुंबईत देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांची बैठक
एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याच कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. शिवसेना पक्षातील मंत्री आणि एकनाथ शिंदेंची वाढती नाराजी दूर कशी करायची, याबाबत दोन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा पार पडली. एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढत गेलीच तर पुढं काय करायचं याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, महायुतीतमध्ये तीन पक्षात आलबेल नसल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, आमच्यात कुठलीही नाराजी नाही, कुंटुंब म्हटल्यावर थोडं फार होतच असतं, असे स्पष्टीकरण शिवसेना मंत्री तथा नेते प्रताप सरनाईक यांनी नाराजीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले होते. तर, एकनाथ शिंदेंनी नाराजीच्या चर्चांवर बोलणे टाळले होते.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.