श्रेयस अय्यर कर्णधार अन् भारत एकाच वेळी खेळणार दोन टी20 सामने! बीसीसीआयचा प्लॅन?
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये वरिष्ठ पुरूष भारतीय संघाचे एक नाही तर दोन संघ एकाच वेळी मैदानावर खेळताना दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तसे नियोजन सुरू केले असल्याचे वृत्त समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, देशात असणाऱ्या प्रतिभावंत खेळाडूंची संख्या पाहता बीसीसीआय ३०-३५ खेळाडूंचा एक गट तयार करणार आहे. त्यामध्ये दोन टी२० संघ करण्याची त्यांची योजना आहे.
बीसीसीआयची ही योजना आयपीएल २०२६ नंतर लागू केली जाऊ शकते. जर असे झाले तर अधिक खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. आता बीसीसीआयच्या या हेतूमागे नेमका विचार काय? भारत आयपीएलनंतर या वर्षात आशियाई क्रीडा स्पर्धा आणि वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० मालिका यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहे. यामुळे बीसीसीआय दोन संघांच्या धोरणावर लक्ष केंद्रित करण्याच्या विचारात आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला सांगितले की, यावर्षी आशियाई खेळ आणि भारत-वेस्ट इंडिज टी२० मालिका एकाच वेळी आयोजित केली असल्याने आम्हाला दोन संघ मैदानात उतरावे लागणार आहेत. यासाठी ३०-३५ क्रिकेटपटूंचा एक गट तयार करण्याचे महत्त्वाचे आहे. यामुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी कधीही निवड करता येईल. आयर्लंड दौऱ्यासाठी खेळाडूंचा एक मोठा गट असेल. हेच आशियाई स्पर्धेसाठीही असेल, तिथेही एक मोठा गट असणार आहे.
याचा अर्थ दोन संघ म्हणजे दोन कर्णधार तर आलेच. त्यामध्ये एक नाव सध्या चांगलेच आघाडीवर आहे, श्रेयस अय्यर. त्याला यामधील एका संघाचे नेतृत्व मिळण्याची दाट शक्यता आहे.
या संघात कोणते खेळाडू असतील? सध्या भारताचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. फलंदाजांमध्ये वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या, यशस्वी जायस्वाल आणि रजत पाटीदार, तर गोलंदाजांमध्ये अशोक शर्मा, कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोई यांचा विचार केला जाऊ शकतो. विकेटकीपरमध्ये ध्रुव जुरेल आघाडीवर असून अष्टपैलूंमध्ये शशांक सिंग आणि अनुकूल रॉय यांना समाविष्ट केले जाऊ शकते.
Comments are closed.