एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीक
सोलापूर : शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji bapu patil) यांच्या सांगोल्यात नगरपालिका निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळत आहे. गेली 55 वर्ष स्वर्गीय गणपतराव देशमुख यांची अखंड साथ देणारे सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर यांनी आज थेट भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत भाजपच्या नावावर नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केली. विशेष म्हणजे या एका प्रवेशासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे थेट हेलिकॉप्टरने सांगोल्यात उतरले आणि आबा बनकर यांचा प्रवेश करत उमेदवारी जाहीर करुन पुन्हा हेलिकॉप्टरने अक्कलकोटकडे रवाना झाले. मात्र, या पक्षप्रवेशाने माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सांगोल्यात सध्या नगरपालिकेत भाजपचा मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ताआहे. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना रोखण्यासाठी भाजपने त्यांच्यासोबतचे युतीचे प्रस्ताव धुडकावत बापूंचे विरोधक असलेल्या शेतकरी कामगार पक्षाशी युती केली. एवढे करून न थांबता नगराध्यक्षपदासाठी त्यांचेच उमेदवार आयात करून त्यांचा प्रवेश भाजपात घडविला, हे सर्व करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे थेट हेलिकॉप्टरने सांगोल्यात आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शहाजीबापू पाटील यांनी थेट भाजपसोबत शेतकरी कामगार पक्षावरही जोरदार निशाणा साधला. गेली 55 वर्ष स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्यासोबत काम करणारे झटक्यात भाजपमध्ये जातात आणि निवडणूक उमेदवारी दाखल करतात, हे पाहून स्वर्गीय गणपतरावांच्या आत्म्यास किती क्लेश होत असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले. यापुढे सोंग बंद करुन स्वर्गीय गणपतरावांचा विचार सोडणाऱ्यांनी त्यांचा फोटोही वापरू नये, त्यांच्या समाधीवर दर्शनाला जाण्याचा अधिकारही त्यांनी गमावला असून आता यापुढे त्या समाधीची जबाबदारी मी उचलणार असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.
शहाजी बापूंची भाजपवर बोचरी टीका
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता बाहेरून आलेल्या लोकांनी हे घडवून आणले असले तरी आमच्या जनतेला हे पटलेले नाही. सोलापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी युती होऊ शकली असती.मात्र, भाजपने एकाधिकारशाही वापरत कोणाशी जुळवून घेतले नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निकालानंतर या सगळ्याचे विश्लेषण होईल असा इशाराही शहाजी बापू यांनी पालकमंत्र्यांना दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात केवळ अकलूज आणि बार्शी या दोन ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र लढत असून तेही स्थानिक नेतृत्वामुळे शक्य घडले आहे. भाजपने केलेले हे सर्व आमच्या स्वाभिमानी जनतेला आवडले नसून सांगोल्यात गुलाल हा शिवसेनेचाच असेल आणि नगराध्यक्षही शिवसेनेचाच होईल, असे भाकीतही त्यांनी केलं.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.