इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभा खासदारकीच्या जागेवर अखेर प्रफुल पटेल यांचे खास असलेल्या राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, गेल्या काही दिवसांपासून येथील जागेवर राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा दावा केला जात होता. छगन भुजबळ यांना राज्यसभेची जागा देऊन त्यांच्या जागी पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची अट भुजबळ यांच्याकडून घालण्यात आली होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने नकार दिल्यानंतर अखेर राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचे नाव जाहीर करण्यात आलं. मात्र, राष्ट्रवादीतील या राजकीय खेळीने छगन भुजबळ नाराज झाल्याचं दिसून आलं. इतरांच्या लेकराबाळांना जो न्याय तोच मलाही मिळायला हवा, असे भुजबळांनी म्हटलं. त्यावर, आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील तटकरे यांना पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, ते माझ्या अनुषंगाने बोलले असतील असे मला वाटत नाही. मी, माझी मुलगी आणि आता अनिकेत सुद्धा निवडून आले आहेत, असे प्रत्युत्तर सुनील तटकरेंनी दिले. तसेच, कोणत्याच राजकीय पक्षाला सर्वांचे समाधान करणे शक्य नाही. प्रत्येकाला अपेक्षा असतेच, काही लोकांच्या मनात वेगळी भावना होऊ शकते. कालही मी प्रतिक्रिया देण्यासाठी आलो तेव्हासुद्धा छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटलांसह जेष्ठ नेते उपस्थित होते, अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली. छगन भुजबळ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राहिले आहेत, त्यांचे काम, योगदान मोठे आहेच त्यांचा मानसन्मान, त्यांना अपेक्षित असलेल्या अनेक गोष्टी घडत आल्या आहेत, यापुढेही घडत राहतील. मी लवकरच त्याविषयीही चर्चा सुद्धा करेल, असेही सुनील तटकरेंनी सांगितले.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांची संसदेतील संख्या लक्षात घेता ते त्यांचा पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत ते वावगे नाही. एनडीएच्या नेत्यांबरोबर घटक पक्षांच्या नेत्यांनी भेटणे काही वावगे नाही. प्रत्येक भेटीचा राजकीय अन्वयार्थ काढणे योग्य नाही. सुनेत्रा वहिंनींनी जो विजय मिळवला त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आहे. त्यामुळे, त्याचा अर्थ असा की, आमच्या पक्षाच्या नेत्यांची किती दखल घेतली जाते, असे म्हणत महायुतीमधील तणावावर तटकरेंनी भाष्य केलं.

अर्थ खात्याबद्दल तटकरेंचं स्पष्टीकरण

अर्थ खात्यासंदर्भात बोलताना तटकरे म्हणाले की, हा प्रश्नच कसा असू शकतो. सुनेत्रा वहिनी आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. त्यात आमचा मुख्य मुद्दाच हा असेल. आम्ही अजून याबाबत मुख्यमंत्री यांना भेटलो नाही, लवकरच आम्ही सगळे या मुद्यावर त्यांना भेटू, असे तटकरेंनी स्पष्ट केले.

हेही वाचा

काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं

Comments are closed.