अशोक खरातच्या मोबाईल CDR मध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदेंची चौकशी कधी? सुषमा अंधारेंचा सवाल
मुंबई : अशोक खरातचा (Ashok Kharat) सीडीआर हा एसआयटी काढत नाही तर कुणीतरी बाहेरचा व्यक्ती काढते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सीडीआर बाहेर काढलेल्या दमानिया यांच्यावर कारवाई करावीच, पण त्यामध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदे यांची एसआयटी चौकशी कधी करणार, असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी विचारला. दीपक केसरकर हे या प्रकरणातील सर्व कड्या जोडणारे व्यक्ती आहेत, त्यांना एसआयटीकडून कधी चौकशीला बोलावले जाणार याची माहिती द्यावी अशी मागणीही अंधारे यांनी केली,
शिंदेंचं खरातसोबत काय संभाषण?
सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्यांनी सीडीआर काढले त्यांच्यावर कारवाई करावीच, पण ज्यांचे सीडीआरमध्ये नाव निघाले त्यांच्यावर काय कारवाई करणार? या सीडीआर प्रकरणात एकनाथ शिंदे यांचं नाव आहे. त्यांच्यावर काय कारवाई करणार? सातारा ड्रग्जच्या प्रकरणात आम्ही अनेक आरोप केले, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याच्या महिला आयोगाच्या आधीच्या अध्यक्षा यांनी इतक्या वेळा अशोक खरातला कॉल का केला याची माहिती समोर आली पाहिजे.
एसआयटीपर्यंत माहिती का पोहोचत नाही?
एकनाथ शिंदे यांच्यावर एसआयटी कारवाई करणार आहे का? एसआयटी चांगलं काम करेल अशी अपेक्षा आहे, पण नाईलाजाने त्याच्या तपासाच्या गतीवर टीका करावी लागतेय असं सुषमा अंधारे म्हणाल्या. एखादी माहिती अंजली दमानिया आणि माझ्यापर्यंत पोहोचते, पण तीच माहिती एसआयटीपर्यंत का पोहोचत नाही असा प्रश्न पडतोय, असंही त्या म्हणाल्या. या काळात पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर ही नावं मोठी आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी का केली जात नाही? असा प्रश्नही अंधारे यांनी विचारला.
रुपाली चाकणकर यांना आतापर्यंत चौकशीला बोलवलं जात नाही. अशोक खरातचा निकटवर्तीय नामकर्ण आवारे याच्यावर कारवाई का केली जात नाही? अशोक खरातचा सीए ललित पोकळे याची चौकशी का केली जात नाही? नाशिकच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये हात असून त्याची माहिती आम्ही एसआयटीला दिली आहे. परंतु त्यावर अद्याप काहीही कारवाई केली जात नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
दीपक केसरकरांचे खरातशी संबंध
सुषमा अंधारे म्हणाल्या की, “दीपक लोंढे हा अशोक खरात आणि दीपक केसरकर यांचा अत्यंत निकटवर्तीय आहे. केसरकरांनी कितीही नाही म्हटलं तरी ते या प्रकरणातील ते अनेक कडा जोडणारे आहेत. दीपक केसरकर हे दीपक लोंढेच्या कायम संपर्कात होते, त्यांच्यामध्ये काय संभाषण होत होतं?”
अधोरी विद्या, तंत्रमंत्र आणि वर्षा बंगल्यावर रेड्याचे शिंग पुरले आहेत अशी सारखी चर्चा केली जात आहे. कुणाच्या तरी फोटोवर फुल्या मारल्या याची चर्चा सातत्याने सुरू असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर जर कुणी फुल्या मारल्या असतील तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे कुणाचा फायदा होणार आहे? याची माहिती समोर आणावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.
ही बातमी वाचा :
आणखी वाचा
Comments are closed.