मोठी बातमी! TET पेपरफुटीप्रकरणात तिघांना अटक, एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी उचललं, तपास सुरू
ठाणे : देशात नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर खळबळ उडाली होती, त्यानंतर सीबीआयने नीट पेपरफुटीप्रकरणी कारवाईचा धडाका लावत अनेकांना अटक केली असून अद्यापही याचा तपास सुरू आहे. मात्र, पेपरफुटीचं हे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. आता, शिक्षकांच्या (TET) TET परीक्षेचा पेपर लीक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. पेपर फुटल्याने उद्या 28 जून रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून पोलिसांनीही कारवाईला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. याप्रकरणातील टोळी विरोधात भिवंडीत कारवाई करण्यात आली असून तिघांना (Police) अटक केल्याची माहिती आहे.
कोनगाव पोलिस ठाणे हद्दीत लावलेल्या सापळ्यात तिघा जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. कोनगाव येथील डायमंड हॉटेलमध्ये पेपरफुटी संदर्भात संशयित असल्याच्या गुप्त माहितीनंतर कोनगाव पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र, हे संशयित त्या ठिकाणी आढळून आले नाहीतय. त्यानंतर, पोलिसांच्या पथकाने सहारा एअरपोर्ट परिसरातून तिघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या पेपरचे प्रश्न आढळून आले आहेत. त्यानंतर, पोलिसांनी या तिन्ही आरोपींना भिवंडीत आणले असून याप्रकरणी भिवंडी कोनगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद होत आहे.
दरम्यान, आधी नीट आणि आता टीईटी पेपरफुटीच्या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आदित्य ठाकरेंनी आता याबाबत संतापजनक भावना व्यक्त केल्या आहेत. नीटचा पेपर फुटला, मागील काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटतो आणि आता टीईटीचा पेपर फुटला. भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा, वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते. देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवले आहेत भाजपने, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी पेपरफुटीवर भाष्य केलं. गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत असून आपल्या राज्याला बदनाम करून ठेवले आहे. दरवर्षी तरुण-तरुणींनी फक्त आंदोलनंच करायची का? आमच्या देशातील तरुणाईने आपल्या भविष्याची स्वप्न कधी पाहायची? असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
रविवारची परीक्षा रद्द, पुढे ढकलली
28 जून, 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
परीक्षा शुल्क पुन्हा द्यावे लागणार नाही
महाराष्ट्रातील 6 लाख 128 शिक्षकांसाठी घेण्यात येणारी टीईटी परीक्षा रद्द करण्यात आली असून ह्या परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. त्यामुळे, परीक्षेसाठी राज्यातील 6 लाख 128 परिक्षार्थींकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसांनी टीईटी परीक्षेची नवीन तारीख घोषीत केली जाईल, 37 शहरातील 1028 परिक्षा केंद्रावर पुन्हा नव्याने परिक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी दिली.
हेही वाचा
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ
Comments are closed.