मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
सोलापूर : जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत (Angar) नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सोलापूर (Solapur) सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या उमेदवारीचा अर्ज बाद केल्यानंतर त्यांच्या अर्जावरील अपील संदर्भातील सर्व बाजूचे युक्तिवाद आज न्यायालयात पूर्ण झाले आहेत. न्यायाधीशानी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळला आहे. जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी उज्वला थिटे यांची अपील फेटाळत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला. दरम्यान, उमेदवारी अर्जावरील सही खोडण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. मात्र, जर सही खोडली असा तुमचा आरोप असेल तर उमेदवाराने पोलिसांत तक्रार दाखल करायला पाहिजे, असा युक्तिवाद इथे सरकारी वकिलांकडून करण्यात आला.
जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांच्या कोर्टासमोर उज्वला थिटे, प्राजक्ता पाटील आणि सरकार पक्षाच्यावतीने तिन्ही वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले. आज सकाळपासून या प्रकरणावर युक्तिवाद सुरु होता. जवळपास 4 तास युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशनी याप्रकरणी निकाल दिला. त्यामुळे, गेल्या 8 दिवसांपासून अनगर नगरपालिकेवरील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर कोर्टाची टांगती तलवार होती. मात्र, आता त्यांची निवड बिनविरोधी विजयी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, आम्हाला ऑपरेटिव्ह ऑर्डर कोर्टाने सांगितली, आमचा अपील अर्ज फेटाळण्यात आला आहे. कोर्टाने काय ग्राउंडवर हा निर्णय दिला हे आम्हाला उद्या सविस्तर ऑर्डर आल्यावरच समजेल, अशी प्रतिक्रिया उज्ज्वला थिटे यांचे वकील दत्तात्रय घोडके यांनी निर्णयानंतर दिली.
थिटेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद
उज्वला थिटे यांचे वकील दत्तात्रय घोडके यांच्या वतीने जवळपास दीड तास कोर्टासमोर युक्तिवाद करण्यात आला. उज्वला थिटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करताना काय काय अडचणीत आल्या हे त्यांनी कोर्टासमोर निदर्शनास आणले. याशिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने कारभार केला. या संदर्भात अनेक तक्रारीचा पाढा वकिलांनी वाचला. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेने फ्रॉड करून सही गायब केल्याचा दावा देखील वकिलांनी कोर्टासमोर केला होता. उज्वला थिटे यांच्या वकिलांनी दीड तास केलेल्या युक्तिवादनंतर सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी आपली बाजू मांडली.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद
उज्वला थिटे यांच्या वकिलांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर बोलताना सरकारी वकिलांनी प्रतिउत्तर दिलं. जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात तक्रार होती तर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? असा सवाल राजपूत यांनी न्यायालयात उपस्थित केला. उज्वला थिटे या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार आहेत, जर त्यांच्यावर दबाव होता तर पक्षाने का कोणती भूमिका घेतली नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे काम केलं ते सर्व आयोगाच्या नियमानुसार केलं आहे. त्यामुळे उज्वला थिटे यांचे अपील फेटाळण्यात यावे अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. दरम्यान, सरकारी वकील यांच्या युक्तिवादनंतर राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांचे वकील अॅड. महेश जगताप यांनीही युक्तिवाद केला.
आमचा घटनेशी संबंध नाही – जगताप
संबंधित प्रकरणात आमच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांचा काहीही संबंध नाही. कारण, उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप हा अपक्ष उमेदवाराने घेतला होता. ज्या उमेदवाराने आपला अर्ज काढून घेतला आहे, असे प्राजक्ता पाटील यांचे वकील अॅड. महेश जगताप यांनी म्हटले. तसेच, सबंधित प्रकरणातील उमेदवार उज्ज्वला थिटे ह्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. सध्याचे राष्ट्रवादाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या राजन पाटील यांच्याविरुद्ध राजकीय हेतू बाळगत हे कुबाड रचलं आहे, असेही वकील जगताप यांनी म्हटले.
हेही वाचा
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
आणखी वाचा
Comments are closed.