उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकांआधी आखली मोठी रणनीती; आमदारांची पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम माटुंग्याच्या ष्णमुखानंद सभागृहात काल पार पडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रम ष्णमुखानंद सभागृहात झाला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी काल केला. आज उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरवण्याबाबत सूचना उद्धव ठाकरेंनी केल्या.

उद्धव ठाकरेंनी विधानसभा आणि विधान परिषद आमदारांची मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेतली. उद्धव ठाकरेंकडून आमदारांना स्नेह भोजनाचं निमंत्रण देण्यात आलं होतं.  आगामी महापालिका निवडणुका आणि पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा विधान परिषद आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली, अशी माहिती आहे.

तीन चार महिने पक्षाकडे विशेष लक्ष द्या

पुढचे तीन-चार महिने पक्षाकडे विशेष लक्ष द्या अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या. महापालिका निवडणुकीत अधिकाधिक आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, ज्या ठिकाणी आपला आमदार, खासदार नाही त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक नेत्यांनी विशेष लक्ष द्या, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आमदारांना केल्या.

पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडा

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात शिवसेना आमदारांनी काय करावं, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.  येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न सभागृहात मांडा, स्थानिक पातळीवरील प्रश्न हे अधिवेशनात आमदारांनी मांडले पाहिजेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

स्थानिक पातळीवरच राजकारण बघून आणि त्या त्या ठिकाणची राजकीय स्थिती बघून  युती आघाडीचा निर्णय पक्ष म्हणून घेऊ, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाची रणनीती कशी असेल याचे संकेत दिले.

उद्धव ठाकरे यांनी  जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख नेत्यांची बैठक देखील आज दुपारी घेतली. या बैठकीत  उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना मतदार याद्यांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदार कसे वाढले? कुठे वाढले? बोगस मतदार शोधा? गटप्रमुखांनी 40 लाख मतदार कसे वाढले हे तपासा, मतदार याद्यांच्या घोळाबाबत माहिती समोर आणा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.