लाचखोर तहसीलदारास रंगेहात अटक; शेतकऱ्याकडून अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : पुणे जिल्ह्यातील सहकार कार्यालयात काही दिवसांपूर्वी लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली होती. त्यामुळे, प्रशासनातील भ्रष्टाचार हा काही केल्या थांबत नसल्याचे समोर आले असून नागरिकांमधून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयात चिरीमिरी दिल्याशिवाय कामच होत नाही, अशी सर्वसामान्यांची ओरड असते. त्यामुळे, अगदी तलाठ्यापासून ते प्रांत अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण एसीबीची जाळ्यात अडकले आहेत. आता, नाशिकमध्ये अडीच लाख रुपयांची लाच घेतांना सिन्नरचे नायब तहसीलदार संजय धनगर एसीबीच्या जाळ्यात अडकले. तर, अकोल्यातही नाफेडचा ग्रेडर लाच मागत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यात तहसीलदाराने तक्रारदाराकडे तब्बल 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर, तडजोडीत अडीच लाखांची लाच स्वीकारताना नाशिकच्या एसीबीने तहसीलदार संजय धनगर यांना रंगेहात पकडले. शहरातील सोपान हॉस्पिटलसमोर ही लाच स्वीकारत असताना एबीसीने थेट धाड टाकत अटक केली. त्यानंतर, येथील मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तर, सर्वसामान्यांकडून या कारवाईचं स्वागत होत असून प्रशासनातील भ्रष्टाचार हा संतापजनक प्रकार असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे.
नाफेडच्या ग्रेडरकडून पैशांची मागणी
अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांची लूट होत असल्याचं दिसून आलं. येथे नाफेडने नियुक्त केलेला ग्रेडर आरुष पटेल याच्याकडून शेतकऱ्यांना प्रतिवाहन 5 हजारांची मागणी होत आहे. पैसे न दिल्यास शेतकऱ्यांचा माल नाकारणे, त्याची प्रतवारी कमी करणे असे धंदे ग्रेडर आरुष पटेल करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. ग्रेडर पैसे मागत असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसने’स्टिंग ऑपरेशन’ करत समोर आणले. ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये ग्रेडर पैसे मागत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, लाचखोर ग्रेडरवर निलंबनाची कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नाफेडकडे केली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.