ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार? संजय राऊतांनी मुहूर्त सांगितला, आजच राज ठाकरेंची भेट घे

राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर संजय राऊत: राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोघे काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागणार आहेत. आता याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलंय. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकेमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर संजय राऊत आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

संजय राऊत म्हणाले की, काल मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानंतर अंगात उत्साह संचारलेला आहे. ट्रीटमेंट चालूच राहील. पण, ही लढाई मराठी माणसाची शेवटची अस्मितेची लढाई आहे. मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, कोणत्याही परिस्थितीत असो, त्याने या लढाईत मुंबई वाचवण्यासाठी उतरायला पाहिजे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही पोस्टर्स लागले आहेत. मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करण्यासाठी पोस्टर्स लागलेत. त्यात कुठल्याही पक्षाचे नाव नाही. सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्रीत हे पोस्टर काढायला लावले. का तर म्हणे आचारसंहितेचा भंग होत आहे. आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता विरोधी पक्षाला आणि या सरकारच्या लोकांना काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut: सत्ताधारी 15 लाखांची खर्च मर्यादा पाळणार आहे का?

संजय राऊत पुढे म्हणाले की, निवडणुका जाहीर होण्याच्या दहा मिनिटाआधीपर्यंत शासनाचे आदेश निघत होते. निधी संदर्भात नगर विकास खात्याचे आदेश निघत होते. विकासाच्या घोषणा होत होता. ते पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोग चार वाजता निवडणुकीची घोषणा करते. हा आचारसंहितेचा भंग नाही का? तुम्ही सरकारला पूर्ण मुभा देत आहात. या निवडणुकीत पैशाचे वाटप प्रचंड होणार आहे. 15 लाखांची मर्यादा आहे. निवडणूक आयोग खात्रीने सांगू शकेल का की सत्ताधारी पक्ष फक्त 15 लाखांवर थांबणार आहेत. जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये शंभर, दीडशे कोटी खर्च करतो. सत्ताधारी पक्षांनी नगरसेवक फोडण्यासाठी, विकत घेण्यासाठी दोन-दोन, पाच-पाच कोटी रुपये खर्च केले. तो 15 लाखांची खर्च मर्यादा पाळणार आहे का? निवडणूक आयोग त्यासाठी कोणती यंत्रणा राबवणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

Sanjay Raut: पैशाचा खेळ करा, पण…

प्रत्येक मराठी माणसाचे हे कर्तव्य आहे की, या वेळेस लढाई प्रत्येकाची असायला हवी. त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे निर्माण झालेली आहे. आम्ही मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या लढाईत उतरण्यास सज्ज आहोत. भले तुम्ही आमच्यावर पाठीमागून वार करा. पैशाचा खेळ करा. पण, आम्ही आमची लढाई लढणार. या महाराष्ट्रातील मराठी माणसाचा एक गट मुंबई मराठी माणसापासून तोडण्यासाठी, उद्योगपतींना देण्यासाठी आसुसलेला असताना मनसे आणि शिवसेनेतले लोक हे मुंबई वाचवायला शौर्याने या लढाने उतरले होते, अशी इतिहासात नोंद होईल, असा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी सांगितला.

Sanjay Raut on Raj Thackeray Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवताय

संजय राऊत पुढे म्हणाले की, मनसे आणि ठाकरे गटाची युतीची अद्याप घोषणा झालेली नाही. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढत आहेत. महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शाहांच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की, आमची युक्ती करा, आमची युक्ती करा, बाबा लगीन, बाबा लगीन… या क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई, ठाणेकल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकेमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत. बाकी इतर महापालिकेमध्ये स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील. ही लढाई 29 महापालिकांपेक्षा मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मुख्य लढाई हे मुंबईचीच होती. आम्ही मराठी लोकं पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत. पण, ही मुंबई आम्ही अमित शाहांच्या घशात जाऊ देणार नाही. या महाराष्ट्राला माहिती आहे की, रहमान डकैत कोण आहे? कोणाला मुंबई विकायची आहे. त्यांना पाठबळ देणारे कोण आहेत. मुंबईचं कराचीतील ल्यारी शहर कोणी केलेला आहे हे अख्या मुंबईला माहित आहे, असा घणाघात देखील संजय त्यांनी केला.

Sanjay Raut: येत्या आठवड्यात युतीची घोषणा व्हायला हरकत नाही

येत्या आठवड्यात युतीची घोषणा व्हायला हरकत नाही. आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. दोन पक्षप्रमुख एकत्र येतात तेव्हा त्यांचा काहीतरी घोषणा करण्याचा कार्यक्रम ठरला असेल ना. काँग्रेस या क्षणी आमच्या सोबत आहे, असे मला दिसत नाही. बिहारच्या निकालानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यांनी आमच्या सोबत मुंबईच्या लढाईत असायला हवे होते, ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांची देखील बोललेलो आहे. पण, त्यांनी ती बाब नेहमीप्रमाणे स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचे आवाहन कायम असेल की, तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका मुंबईच्या लढाईत घेऊ नये. लोक हे विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देखील येणार आहे ते लक्षात घ्या, असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. दरम्यान, राज ठाकरे यांची आज भेट घेणार असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा

Thane Election BJP: ठाण्यात तडीपार गुंडाचा भाजप प्रवेश शेवटच्या क्षणी रोखला, वरिष्ठ नेते आयत्यावेळी कार्यक्रमाला आलेच नाहीत, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.