लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब; पोलिसांकडून दोघांना अटक

मुंबई : लग्नाचा (Marriage) बनाव रचून, हनिमूनच्याच रात्री नवरदेवाच्या घरातील मौल्यवान वस्तू, पैसे आणि दागिने घेवून फरार होणाऱ्या चोरटी नवरी आणि तिचा तथाकथित बापाला काशिमीरा पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. या बाप-लेकीच्या जोडीने आतापर्यंत पाच जणांना फसवल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे. तसेच, याप्रकरणात आणखीनही कारनामे बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या मुलांचे लग्न जमत नसल्याने, किंवा मुलाचे वय वाढत असल्याने केवळ नात्यागोत्यातल्याच मुलीशी लग्न करावे, अशी संकल्पना मोडीत निघाल्याने, याचा गैरफायदा घेत लग्नाच्या नावाने फसवणूक करणारी टोळी सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे.

मिरा भाईंदरच्या काशिमीरा येथे राहणारे 53 वर्षांचे सेवलकुमार नाडर हे व्यवसायाने इस्टेट एंजंट होते, त्यांना लग्न करायच होतं. तेवढ्यात आरोपीचा तथाकथित बाप केसरीमल रांका याने नाडार यांच्याशी संपर्क साधला. लग्न लावून देण्याकरीता त्याच्याकडून 44 हजार रुपये देखील घेतले आणि त्यानंतर त्याने आरोपी नेहा अरुण खेडेलवाल उर्फ जन्नत या 22 वर्षीय तरुणीशी लग्न लावून दिलं. मात्र, लग्न लागल्यानंतर दोन दिवसांनी बाप आणि मुलगी फरार झाली. नाडार यांच्या घरातील मौल्यवान वस्तू, सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 5 लाखांचा ऐवज घेऊन ती नववधु तरुणी पसार झाली. त्यामुळे, आपली फसवणूक झाल्याचं कळल्यावर नाडर यांनी थेट काशिमीरा पोलीस ठाणं गाठलं आणि चोरट्या नवरीची तक्रार केली. काशिमीरा पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केल्यावर त्यांच्याही भुवया उंचावल्या. कारण, या तरुणीने आत्तापर्यंत एक दोन नव्हे तब्बल पाच जणांना असं लग्न करुन फसवल्याच समोर आलं.

या बाप बेटीच्या जोडीनं अहिल्यानगर तालुक्यातील संगमनेर, जोगेश्वरी, बोरीवली, मुंबई आणि जळगाव येथील पाचोरा येथे अशाच प्रकारे गुन्हा केल्याचं समोर आलं. लग्न करुन झाल्यावर हनिमुनच्या दिवशीच ती घरातील मौल्यवान वस्तू, सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम घेवून फरार होतं होती. अहिल्यानगर येथील संगमनेर तालुक्यातील विशाल डोके याची देखील अशीच फसवणूक या बाप लेकिने केली आहे. डोके याचा लग्नाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

संगमनेरची मुलगी, नाशिकचा तथाकथित बाप

आरोपी नेहा अरुण जाधव ही मुळची राहणारी संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील आहे. तिचे वय 22 वर्षे असून तिच्या तथाकथित बापाचे नाव केसरीमल लक्ष्मीलाल रांका असं आहे. रांका हा नाशिक येथील राहणारा आहे, त्याच वय 41 वर्षे आहे. काशिमीरा पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. बाप मुलीची ही टोळी लग्नाचं वय निघून गेलेल्या, उशीरापर्यंत लग्न न झालेले किंवा ज्यांच्या पत्नी मृत पावल्या असतील, असे नवरदेव शोधायचे आणि लहान लग्नसोहळा आटपून, हनिमुनच्या दिवशीच घरातील मौल्यवान वस्तू, सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन मुलगी फरार व्हायची. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या टोळीमार्फत आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा

सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर

आणखी वाचा

Comments are closed.