राष्ट्रवादी सोडणाऱ्या परांजपेंना उपाध्यक्ष करू नका, सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सुनेत्रा पवार : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम केलेले आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून देण्यात येणारे महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष पद देऊ नये. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीला रामराम केला असल्याने त्यांच्या नावाचा विचार करू नये. लवकरच त्याबदल्यात नवीन नाव सुचवण्यात येईल असा उल्लेख पत्रात करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. महायुतीत लवकरच विविध महामंडळांचे वाटप पार पडणार आहे त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलं आहे.

महायुती सरकारकडून लवकरच बहुप्रतिक्षीत महामंडळ वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार

राज्यातील महायुती सरकारकडून लवकरच बहुप्रतिक्षीत महामंडळ वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून महायुतीमधील (Mahayuti) अनेक नेते आणि पदाधिकारी हे महामंडळांच्या (Mahamandal) वाटपाकडे डोळे लावून बसले आहेत. अखेर महामंडळांचे वाटप (Corporation Allocation) करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांना महामंडळांचे जागावाटप लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सध्या महायुतीचे नेते आणि पदाधिकारी यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

कोणत्या पक्षाला कोणते महामंडळ मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात

येत्या महिनाभरात राज्यातील महामंडळाचे जागावाटप पूर्ण होईल. महामंडळ वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार, भाजपा 48 टक्के, शिवसेना (Shivsena) 29 टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 20 टक्के महामंडळ, असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र, कोणत्या पक्षाला कोणते महामंडळ मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. येत्या महिनाभरात यावर शिक्कामोर्तब होईल. महायुतीच्या पुढील बैठकीत महामंडळातील सदस्य वाटप होईल, असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महामंडळ वाटपाच्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होईल. यानंतर तिन्ही पक्षांचे नेते कोणत्या महामंडळावर कोणाची वर्णी लावायची हा निर्णय घेतील. त्यासाठी महायुतीचे अनेक नेते आणि पदाधिकारी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील महत्त्वाच्या महामंडळाची सूत्रे कोणत्या नेत्यांकडे जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आनंद परांजपे (Anand paranjape) यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपल्या सर्वच पदाचा आणि संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, ते कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती, अखेर आज त्यांनी शिवसेनेचा (Shivsena) गमछा गळ्यात घातला. आनंद परांजपे यांनी 2012 मध्ये शिवसेनेला राम राम करताना एकनाथ शिंदे यांची नाराजी ओढवून घेतली होती. मात्र, गेल्या काही दिवसात परांजपे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही नाराजी दूर केली.

आणखी वाचा

Comments are closed.