मोठी बातमी : अमित शाहांकडून एकनाथ शिंदेंना सुपारी, मात्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर- ठाकरे
अहिल्यानगर : शिवसेना (Shivsena) पक्षातील ऑपरेशन टायगरनंतर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा आयोजित करत खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघातून त्यांनी फुटीर खासदारांवर तोफ डागली होती. त्यानंतर, विदर्भ, मराठवाडा आणि आज शिर्डीतील फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंनी आपल्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवरही टीका केली. खासदार फुटीचं हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र असल्याचं त्यांनी म्हटलं. आता, शिर्डीतून (Shirdi) पुन्हा एकदा हाच धागा पकडत साईचरणी प्रार्थनाही केली.
ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेतून भाजप, एकनाथ शिंदेंसह फडणवीसांनाही लक्ष्य केलं. मी तुम्हाला सूचना करतोय, आपला खासदार पळालाय सापडला तर सोडू नका. काहीच्या रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते, हे भाऊसाहेब नाही खाऊसाहेब वाकचौरे आहेत, जाऊ तिथं खाऊ. 2009 ला या गद्दारला निवडून आणलं 2014 ला हा पळाला, हा काँग्रेसमध्ये गेला तिकडे सुद्धा बट्याबोळ झाला. जरा वाकचौरे थांबला असता तर केंद्रात 2014 ला आपलं सरकार होतं, आता जरी थांबला असता तरी आपलं सुद्धा सरकार येणार आहे, असे म्हणत खासदार वाकचौरे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.
फोडाफोडीसाठी शाहसेनेला सुपारी
भ्रष्ट राजवट गाडून टाक, देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीचं रक्षण कर, अशी प्रार्थनाच उद्धव ठाकरेंनी साईचरणी केली. प्रत्येकाला कुठेतरी शेवट असतो… 2029 नंतर वाली कोण? या शर्यतीत देवेंद्र फडणवीस येऊ शकतात, त्यामुळे आत्ताच त्यांचा पत्ता कट कर, एसंशी गटाला शाहसेनेला सुपारी दिली आहे, देवेंद्र फडणवीसला गुंतून ठेव. शाहसेनेने आपले खासदार फोडले आणि राज्यात भाजपपेक्षा जास्त खासदार आता शाहसेनेचे झाले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पडद्यामागे, फोडाफोडीमागे अमित शाह असल्याचं म्हटलं.
खासदार फोडायला पैसे आहेत
उद्धव ठाकरेंबद्दल आम्ही काही बोलणार नाही म्हणतात खाऊसाहेब… तू काय बोलणार, लोक जोड्याने मारतील. खाऊसाहेब आपल्याकडे आला होता, उद्धवसाहेब देव माणूस आहेत म्हणतो, पण त्याचा डोळा नैवद्यावर होता. खासदार गेल्यानंतर मला त्यांच्या भानगडी लोक सांगत आहेत, तुम्ही आधी सांगितलं नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. गहिवरून मला येतं, जेंव्हा साधे शिवसैनिक म्हणतात पदरमोड करून या खासदारला निवडून आणला होतं, साधे शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. विकास निधी हवा आहे, 15 कोटी मिळाले खाऊसाहेब, यांनी 70 लाख खर्च केले. करदात्याचा पैसा आहे… निधी मिळणारचं… पण फुटाफुटीचे दिवस आहेत. नीट पेपर फुटला.. खासदार फोडायला यांच्याकडे पैसे आहेत… नीच नालायक लोक… बैल नाही म्हणून शेतकऱ्याची बायको नांगर ओढते… बातमी आल्यानंतर बैल दिला, पण त्यापेक्षा खासदार द्यायला पाहिजे, असे म्हणत फोडाफोडीवरुन उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला.
उद्याचा दिवस माझा
संतापला वाचा फुटली पाहिजे, आपण नुसतं सहन करायचं, आपलं कोंबडीच्या पिंजऱ्यासारखा झालं आहे, आज ती कोंबडी मरतीये दुसरे फक्त मालकाचे दाणे खातात, त्यांना हे माहित नसत की उद्या तुम्ही सुद्धा मरणार आहात. तुम्ही कोंबड्या सारखा जगू नका… आज नाही पण उद्याचा दिवस माझा येईल.. .हो, उद्याचा दिवस आपला असणार.. वर-खाली सगळं होत, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. देशाचं विभाजन करण्याचा त्यांचा डाव होता… दोन तृतीयांश संख्याबळ त्यांना हवाय. त्यासाठी आता फोडाफोडी करून संख्याबळ तयार करत आहेत, ते झालं की ह्या अधिवेशनात विधेयक येईल. ठाकरे संपला की महाराष्ट्रामध्ये प्रश्न विचारणारा कोणी राहणार नाही. हिंदुहृदयसम्राट सम्राट ही जागा फक्त बाळासाहेब ठाकरे… बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे… कोणीही त्यांची जागा घेऊ शकत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.
पंख छाटण्यावरुन टोला
मुख्यमंत्री म्हणतात मला पंख नाही, मी पक्षी नाही, माझे पंख कसे छाटणार? अहो हा वाक्प्रचार आहे. विधानसभा अध्यक्षांकडून मराठी शिका…पंख कापा ते म्हणतात मी पक्षी नाही… मग काय कापायचा ते सांगा… पंख कापतात अजून काय कापतात, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. विधानसभा अध्यक्ष ज्याला मराठी येत नाही, मराठी नीट बोलता येत नाही आणि तो माझ्या पक्षाचा निर्णय देणार, दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की अशा विधानसभा अध्यक्षकडून विधानसभेचा कारभार चालतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष आणि फडणवीसांनाही लक्ष्य केलं. सहन होत नाही पचतही नाही असं देवेंद्र फडणवीस यांचं झालंय. जी हुजूर… करत दिल्लीसमोर नतमस्तक व्हावं लागतय. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना संघाचा पाठिंबा आहे.
तीन वर्षात सरकार आपलं येऊ शकतं
आपण भांडत बसणार आणि राज्य ते करणार…आपलेच गेले.. रक्ताचे नाही म्हणणार… कारण आता त्यांच्यात गद्दारीचं रक्त आहे. आता खासदार फोडणारे त्यांना कसं फोडायचं ते बघा, माझ्याकडे श्रद्धा आहे… सबुरी आहेत… त्याच्यामध्ये जो कोणी असेल त्याला तुडवण्याची हिंमत माझ्यात आहे. तीन वर्ष आहेत… तीन वर्षाच्या आत सरकार सुद्धा आपलं येऊ शकतं, खासदार जाणे हे एकप्रकारे शुभ शकून आहे, असे भाकीतही उद्धव ठाकरेंनी केले.
हेही वाचा
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Comments are closed.