‘भाजपला पाठिंबा दिला तरच देशभक्त, नाहीतर…’; हल्ल्यानंतर अभिषेक बॅनर्जींचा पहिला घणाघात; राहुल

अभिषेक बॅनर्जी: पश्चिम बंगालमधील (West Bengal) दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील सोनारपूर येथे तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्यावर झालेल्या जमावाच्या हल्ल्यानंतर राजकारण प्रचंड तापले आहे. निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसेतील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी बॅनर्जी गेले असता हा प्रकार घडला. या हल्ल्यानंतर टीएमसी आणि भाजप (BJP) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, या हल्ल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र निषेध केला असून, त्यावर अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधींचे आभार मानत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi on Abhishek Banerjee: खासदारावरील हल्ला हा जनतेवरील हल्ला : राहुल गांधी

अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर तीव्र चिंता व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी याला लोकशाहीवरील आघात म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, “खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सोनारपूरमध्ये झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. एका खासदारावर झालेला हल्ला म्हणजे केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून, तो त्यांना निवडून देणाऱ्या जनतेवर आणि आपल्या लोकशाहीवर (Democracy) झालेला हल्ला आहे. हे भाजपच्या सूडाच्या राजकारणाचे हिडीस रूप आहे. राजकीय मतभेद कधीही हिंसेचे कारण बनू शकत नाहीत.” यासोबतच त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Abhishek Banerjee: हुकूमशाहीसमोर गुडघे टेकणार नाही : अभिषेक बॅनर्जी

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांचे आभार मानले आणि भाजपवर देश विभागण्याचा आरोप केला. बॅनर्जी म्हणाले, “राहुल जी, तुमच्या काळजीसाठी आणि निरंतर समर्थनासाठी धन्यवाद. भारताच्या आत्म्याचे रक्षण करण्यासाठी, लोकशाही संस्था वाचवण्यासाठी आणि संविधानातील मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आपण सर्व एकत्र आणि ठाम आहोत.”

त्यांनी पुढे म्हटले की, “गेल्या वर्षी मी एका सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून पाच देशांचा दौरा करून भारताचे प्रतिनिधित्व केले होते, तिथे मी दहशतवादाविरुद्ध (Terrorism) देशाची बाजू मांडली. मात्र आज, स्वतःला राष्ट्रवादाचे रक्षक म्हणवणाऱ्यांनी पसरवलेल्या राजकीय हिंसाचार आणि राज्य पुरस्कृत दहशतवादाचा मी स्वतः बळी ठरलो आहे.”

Abhishek Banerjee: ‘भाजपला पाठिंबा दिला तरच देशभक्त, नाहीतर…’

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कडाडून टीका करताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “आजच्या भाजपची हीच खरी वास्तविकता आहे. जर तुम्ही त्यांना पाठिंबा दिला तर तुम्ही देशभक्त (Patriot) आहात. जर तुम्ही त्यांना प्रश्न विचारले, तर तुम्ही त्यांचे टार्गेट (Target) बनता. जर तुम्ही त्यांच्या बाजूने उभे राहिले तर तुमचे कौतुक होते आणि जर तुम्ही त्यांच्या विरोधात उभे ठाकले, तर ते तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात.”

आपल्या तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट करत बॅनर्जी म्हणाले की, “तत्त्वे गहाण ठेवून आरामाचे आयुष्य जगण्यापेक्षा लोकशाहीचे रक्षण करताना अशा धमक्यांचा सामना करणे मी अधिक पसंत करेन. सत्ता तात्पुरती असते, तर जनतेची इच्छा कायमस्वरूपी असते. मी फक्त जनतेसमोर नतमस्तक होईल, सत्तेत बसलेल्या हुकूमशहा समोर कधीच नाही,” असे त्यांनी म्हटले. इंडिया आघाडी (INDIA Alliance) एकत्र असून आपण या द्वेषाच्या आणि भीतीच्या राजकारणाचा पराभव करू, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Abhishek Banerjee Attack: अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर राहुल गांधींचा ममता बॅनर्जींना फोन; म्हणाले, ‘गरज पडल्यास आम्ही…’

आणखी वाचा

Comments are closed.