IPL 2026 – 13 कोटींच्या खेळाडूनं फक्त 15 धावा केल्या, आता म्हणतोय, कौशल्याला वावच नाही!
जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिया प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामाचा थरार नुकताच संपला. अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरात टायटन्स संघाचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरले. यंदाच्या हंगामामध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. जवळपास प्रत्येक लढतीमध्ये गोलंदाजांची धुलाई झाली आणि 200, 250 धावांचा डोंगर उभा राहिल्याचे दिसले. आता यावरून नवीन वादाला तोंड फुटले असून इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू लियाम लिव्हिंगस्टन याने स्पष्ट शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली आहे.
लियाम लिव्हिंगस्टन याला सनरायझर्स हैदराबाद संघाने तब्बल 13 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले. हैदराबादच्या संघात इतरही बडे खेळाडू असल्याने त्याला बराच काळ बेंचवर बसावे लागले. अवघ्या दोन लढतींमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली. मात्र यातही तो काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याला फक्त 15 धावा काढता आल्या. आता आयपीएल संपल्यानंतर त्याने खेळपट्ट्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
आयपीएलमधील सपाट खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे खूप सोपे झाले असून एकामागोमाग एक षटकारांचा पाऊस पडताना पाहणे अत्यंत कंटाळवाणे झाले आहे. यात गोलंदाजांना आपले कौशल्य दाखवण्यास कोणतीही जागा उरली नाही, असे तो म्हणाला. यासाठी त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या लढतीचाही दाखला दिला.
मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेले 230-40 धावांचे आव्हान आम्ही 18 व्या षटकात पार केले. खरे सांगायचे तर हे सगळे खूप कंटाळवाणे वाटू लागले आहे. फक्त षटकार खेचताना पाहण्यात कोणतेही खरे कौशल्य दिसून येत नाही. खेळपट्ट्या इतक्या सपाट केल्या जातात आणि त्यात ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा नियम असल्याने फलंदाजांना मोकळे रान मिळते. मुंबईत चेंडू हवेत खूप वेगाने ट्रॅव्हल करतो, तर हैदराबादमध्ये एकाच खेळपट्टीवर 5 ते 6 सामने खेळवले गेले, असे लिव्हिंगस्टन म्हणाला.
Comments are closed.