भाजपने गणेश नाईकांना शिवसेना संपवण्याची परवानगी द्यावी, आम्हीही सज्ज; शिंदेंच्या खासदाराचे पत्र
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (मराठी) आणि भाजपचे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यातील वाद आता चांगलाच वाढल्याचं दिसतंय. भाजपच्या वरिष्ठांनी जर परवानगी दिली तर यांचे नामोनिशाण मिटवून टाकू असं गणेस नाईकांनी म्हटलं. त्यावर आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईकांना आवरा अशी मागणी मस्के यांनी केली. गणेश नाईंकाना शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच, आम्हीही उत्तर द्यायला सज्ज आहोत असंही मस्के म्हणाले.
मोदीजींच्या आणि अमितभाई शाहांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिवस रात्र काम करत आहेत. हेच गणेश नाईकांना पाहावत नसल्याने तसे वक्तव्य करत असल्याचं मस्के म्हणाले. शिंदेंच्या उठावानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं असल्याचं मस्के म्हणाले.
Naresh Mhaske Letter To Ravindra Chavan : नरेश मस्के यांचे पत्र जशास तसे
आदरणीय श्री रवींद्र चव्हाण जी
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश.
पत्रास कारण की, नवी मुंबईतील आपले ज्येष्ठ नेते श्री गणेश नाईक साहेब यांनी आपले मित्र पक्ष असलेल्या राज्य आणि अनेक महानगरपालिका नगरपालिकांमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या, युती म्हणून लढून युती म्हणून जिंकून आलेल्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे…
एकेकाळी स्वतः शिवसैनिक असलेल्या श्री गणेश नाईक साहेब यांनी आमचे प्रमुख नेते राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना अनेक वेळा डिवचून नवी मुंबईतून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचे, टांगा पलटी करण्याचे आणि शिवसेनेला नवी मुंबईतून मुळातून संपवून टाकण्याचे स्पष्ट इरादे अनेक प्रसारमाध्यमातून जाहीर रित्या मांडले आहेत. आता तर त्यांनी जाहीरपणे, पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू, असे बेताल वक्तव्य केले आहे.
मी तमाम शिवसैनिकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती करतो की त्यांच्या ह्या त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच. आमची तयारी आहे.
खरे म्हणजे, महाराष्ट्रात महा बिघाडीची सत्ता उलथवून टाकण्यात, भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय शिंदे साहेब या दोघांची मोठी भूमिका राहिली आहे. त्यानंतरच युतीचे सरकार महाराष्ट्रात येऊ शकले आणि आज कल्याण डोंबिवली ठाणेमुंबई या ठिकाणी युती म्हणून लढत देऊन महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकात आपण मोठे यश मिळवले आहे.
या सर्व निर्णयांमध्ये आपली ही सक्रिय भूमिका राहिली आहे. सगळीकडे युती असताना युतीतल्या मोठ्या घटक पक्षाबद्दल असे विधान करणे म्हणजे आपल्या पक्ष नेतृत्वावरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे. एखाद्या व्यक्तीवरचा राग समजू शकतो परंतु, त्यासाठी पक्ष, पक्षीय भूमिका, पक्षाचा अजेंडा या सगळ्या बाबी धुडकावून लावत गणेश नाईक साहेब आमचे नामोनिशाण मिटवण्याचे वक्तव्य करीत आहेत.
आदरणीय मोदीजींच्या आणि आदरणीय अमितभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब दिवस रात्र काम करीत आहेत.
काही बाबतीत विचार वेगळे असले तरी एक हिंदुत्ववादी, राष्ट्रीय विचारांचे स्थिर सरकार आपण त्यामुळेच देऊ शकलो आहोत. परंतु, त्यांना हे बघवत नसल्यानेच कदाचित ते अशी मागणी करत असावेत.
धर्मवीर आनंद दिघे साहेब असताना गणेश नाईक साहेबांना शिवसेनेने कशी धोबीपछाड दिली होती ते त्यांनी एकदा आठवावे. किंबहुना आपण त्यांना त्याचे स्मरण करून द्यावे बाकी शिवसेना त्यांच्या प्रत्येक आव्हानाला उत्तर द्यायला सज्ज आहे आज नवी मुंबईत दहा जागाही शिवसेनेच्या निवडून येऊ शकत नाहीत अशा वल्गना करणाऱ्या गणेश नाईक साहेबांना आम्ही 42 जागा निवडून आणून दाखवले आहेत. कदाचित त्यामुळेच त्यांची अस्वस्थता वाढलेली असू शकते. दिवस रात्र लोकांच्यासाठी कार्यरत असणाऱ्या शिंदे साहेबांवर त्यामुळेच त्यांचा राग असू शकतो. तेव्हा त्यांच्या सर्व वक्तव्यांचा सखोल विचार करून त्यावर चिंतन करून आपण त्यांना शिवसेना संपवण्याची जबाबदारी देऊन टाकावीत ही नम्र विनंती.
महा बिघाडीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश महाजन साहेब आणि अन्यही काही नेत्यांवर गंडांतर आणून त्यांच्यावर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याचा प्रयत्न केला. शिंदे साहेबांच्या उठावानंतर युतीचे सरकार आले आणि त्यामुळेच त्यांना चोख प्रत्युत्तर देता आले.
दिल्लीत सत्ता स्थापन करतेवेळी जेव्हा शिवसेनेने घटक पक्षाची भूमिका सत्तेत स्वीकारली. त्यावेळी, आजही सरकारवर प्रश्नचिन्ह उभे राहिले तर शिवसेनेकडून त्याला धडाकेबाज उत्तर दिले जाते, सरकारच्या बाजूने विरोधी पक्षाने केलेल्या विरोधाचा फडशा पाडला जातो.
दिल्लीत NDA घटक पक्ष म्हणून आणि महाराष्ट्रात युतीचे भागीदार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी सत्तेत मोठ्या निर्णयात मोठ्या प्रकल्पांमध्ये खारीचा वाटा तरी उचलला आहे असे तुम्हाला वाटते का हो?
आपल्या पक्षात पक्षश्रेष्ठीचा भंग करणारे नेते पक्षाची रचना आणि अध्यक्षांचे निर्णय याला न जुमानता मनमानी करत आहेत असे तुम्हाला वाटते का हो?
कधीकधी तर आम्हाला असे वाटते की शिंदे साहेबांपेक्षा गणेश नाईक साहेबांचा पक्ष नेतृत्वावरच अविश्वास आहे आणि त्यामुळेच ते असे बेताल वर्तन बेछुटपणे करू शकतात. त्यांच्या उचललेल्या प्रत्येक पावलाचा सखोल अभ्यास आणि चिंतन करून तुम्ही त्यांना पुढील जबाबदारी सोपवाल अशी अपेक्षा आहे.
सदैव महायुतीचे हित जपणारा, पक्षादेश शिरसावंद्य मानून युती धर्मासाठी लढणारा एक सच्चा शिवसैनिक – नरेश म्हस्के
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.