ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
मुंबई : राजकारणात नसूनही नेहमी चर्चेत असणाऱ्या मिसेस मुख्यमंत्री Amruta fadnavis (अमृता फडणवीस) यांनी एक राजकीय बॉम्ब फोडला आहे. शिवसेनेतल्या बंडावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुडी घालून शिंदेंना भेटायला जायचे, असा गौप्यस्फोट अमृता फडणवीसांनी एबीपी माझावरच केला होता. आता पुन्हा एकदा 2019 च्या राजकीय महानाट्याचा आणखी एक गौप्यस्फोट त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. विधानसभेच्या मतदानाआधीच उद्धव ठाकरे (उद्धव विचार) भाजपची साथ सोडतील, अशी शंका मी व्यक्त केली होती. मात्र, देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) माणूसकीवर विश्वास होता, विश्वास ठेवण्यावर विश्वास होता, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलं.
एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्ट शोच्या पहिल्याच भागात अमृता फडणवीसांनी एक किस्सा सांगितला. सन 2019 मध्ये विधानसभेच्या मतदानाआधीच उद्धव ठाकरे भाजपची साथ सोडतील, अशी शंका अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांजवळ बोलून दाखवली होती. अमृता फडणवीसांचं हे भाकीत नंतर खरं ठरलं. पण, फडणवीसांना मात्र त्यावेळी ठाकरेंवर गाढ विश्वास होता, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे माझ्याही जवळचे आहेत, याशिवाय भाजप-शिवसेना ही लाँग टर्म युती आहे, असे फडणवीसांनी म्हटले होते. देवेंद्रजींना माणूसकीवर विश्वास होता, विश्वास ठेवण्यावर त्यांना विश्वास होता, असेही त्यांनी सांगितलं. तसेच फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममधला एक महत्त्वाचा फरकही अमृता फडणवीसांनी पॉडकॉस्टमध्ये सांगितला आहे. त्यानुसार, मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुक्तपणे काम करता येत नव्हते, नाही म्हटलं तरी ठाकरेंचा दबाव त्यांच्यावर होता. मात्र, आताच्या टर्ममध्ये ते स्वतंत्रपणे, मुक्तपणे काम करत आहेत, असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.
सध्याच्या दोन्ही पक्षाचा चांगला पाठिंबा – अमृता फडणवीस
2019 मध्ये कुठल्याही पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं, त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाची गरजच होती. आता, स्थीर सरकार असून दोन्ही पक्षांचा चांगला पाठिंबा भाजपला आहे. त्यामुळे, देवेंद्रजींच्या महाराष्ट्रासंदर्भातील मिशन आणि व्हिजनमध्ये कुणीही अडसर नाही. तसेच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही कुठल्याही कामात देवेंद्रजी त्यांना पाठिंबाच देतात, असेही अमृता फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सत्तेचं अर्ध-अर्ध वाटप ठरलं होतं, ते न झाल्याने युती तुटली – दानवे
निवडणूक आणि निकालानंतर जो प्रश्न उपस्थित झाला होता, त्यावरुन वेगळा विषय झाला. कारण, सत्तेचं वाटप अर्धे-अर्धे व्हावे असे ठरले होते. गृहमंत्री अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात हे ठरलं होतं, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. तसेच, आधीच काँग्रेसमध्ये जायचं हे ठरलेलं नव्हता, पण परिस्थितीनुसार उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना बोलवले होते. त्यावरुन, दोन पक्षाचं आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं किती चांगलं होतं हे लक्षात येईल, असेही अंबादास दानवे यांनी म्हटलं.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.