जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री अहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही – मुख्यमंत्री
अकोला : राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा (Ladki bahin yojna) करिश्मा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रचार सभांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेबाबतचं आश्वासन देत आहेत. काहीही झालं तरी ही योजना बंद पडणार नाही, असं ते ठासून सांगत आहेत. तसेच, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच आमचं सरकार आल्याचेही ही मंडळी सांगते. कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन देत जोपर्यंत एकनाथ शिंदे आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असे सांगितले होते. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) लाडक्या बहिणींना शब्द दिला.
अकोला जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जाहीर सभा झाली. यावेळी, बोलताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना घरं, शिक्षण आणि आरोग्य सुविधा दिल्या. आमच्या महाराष्ट्रातील विजयाला 23 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं. लोक म्हणत होते आता हे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार. पण, मी माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना तुमचा हा देवाभाऊ बंद होऊ देणार नाही, असा शब्दच अकोल्यातली सभेतून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना दिला.
आजचा दिवस वेगळ्या अर्थाने महत्वाचा आहे, अयोध्येत मंदिर झाल्यानंतर आज कळस आणि धर्मध्वजाचं अनावरण झालं. मंदिराचं काम पूर्ण झालं तेंव्हाच समजलं जातं जेंव्हा कळसाचं काम पूर्ण होतं. अयोध्येच्या मंदिरावर जसा भगवा फडकला तसाच भगवा हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट नगरपालिकेवर भगवा फडकवा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी येथील सभेतून केले. पारदर्शी आणि प्रामाणिकतेने कारभार चालविण्यासाठी भाजपने उमेदवार दिले आहेत. हिवरखेड ग्रामपंचायतीचे थेट नगरपरिषद होण्याचे श्रेय आमदार प्रकाश भारसाकळे यांचे आहे. नगरपरिषद करण्याचं तुमचं म्हणणं मी ऐकलं, आता तुम्ही सत्ता देत माझे ऐका. या निवडणुकीत कुणाला नावं ठेवण्याकरिता आणि टिका करण्यासाठी आलेलो नाही. आमच्याकडे प्रत्येक शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे. गावांवर लक्ष देताना शहरावर दुर्लक्ष होत आलंय, गावातील लोक शहरात आले आहेत. पण, शहरावर लक्ष न दिल्याने ती बकाल झाली आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथील जनतेला आवाहन केलं. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगर परिषदेच्या भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी चिखली येथे पोहोचले.
एकनाथ शिंदेंचाही लाडक्या बहिणींना शब्द
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी एवढा मोठा विजय मिळवून दिला, इतिहास घडला आहे. विरोधकांनी सरकार बनवले, पण त्यांचे मनसुबे उधळून टाकले. त्यांचे हॉटेलचे बुकिंग तुमच्यामुळे रद्द केले. बर्फावर झोपून मारा असे सांगणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी घरी पाठवले, लाडकी बहीण योजनेला विरोध केला, कोर्टात गेले, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. तसेच, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, लाडकी बहीण योजना सुरू झाली. आता, केवायसीची देखील अडचण दूर करू, एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही, असा शब्दच एकनाथ शिंदेने नाशिकच्या सटाणा येथील सभेतून लाडक्या बहिणींना दिला होता.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.