‘एनडीए’मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं
मुंबई : दिवंगत नेते तथा राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली होती. मात्र, विलिनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. मात्र, आता चर्चा सुरू आहे ती, शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होण्याची, गेल्या काही दिवसांत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं ही चर्चा जोर धरत आहेत. तर, कुणीही महायुतीत येणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीए सोबत यायच असेल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच यावं लागेल, असा संदेश भाजप श्रेष्ठींकडून देण्यात आल्याची आल्याची माहिती आहे.
ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आपला स्वतंत्र गट स्थापन केला. त्यानंतर, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा जोर धरत आहेत. त्यामध्ये, फुटीर खासदारांपैकी दोघांना केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात येईल, असेही समजते. तर, दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळ विस्तारही होणार असून अर्थ खातं जयंत पाटील यांना देण्यासाठीच ते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तेत सहभाग होऊ शकते, असे काहींना वाटते. मात्र, आता भाजपने राष्ट्रवादीपुढे एक अटक ठेवली असून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातूनच सोबत यावे, अशी दिल्लीतून सांगण्यात आल्याची माहिती आहे.
भाजपकडून स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एनडीएमध्ये सोबत घेण्यापेक्षा एकत्र राष्ट्रवादीलाच प्राधान्य देण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन भाजपसोबत आल्यास दोन्ही पक्षांना प्रत्येकी 1 मंत्रीपद देण्यास भाजप श्रेष्ठी सकारात्मक असल्याचेही समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांची मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायला नकार घंटा असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सत्तेत आणि केंद्रातही एनडीएसोबत सत्तेत येण्यासाठी अडचण ठरत असल्याचं दिसून येत आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील – रवि राणा
राजकारणामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या आहे. त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांचे पार्टी एकत्र येतील. दिल्ली आणि केंद्रामध्ये सुप्रिया सुळे मंत्री बनतील. तर राज्याची सूत्र सुनेत्रा पवार यांच्या हाती असतील, असा दावा महायुतीमधील आमदार रवी राणा यांनी केला आहे. राजकारणात काही जरी असलं तरी सर्व काही शक्य आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे मंत्री बनतील आणि सुनेत्रा पवार राज्य बघतील, येत्या पंधरा दिवसात हे चित्र आपल्याला दिसेल, असेही ते त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’
Comments are closed.