धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ

मुंबई : सार्वजनिक ठिकाणाहून, बस स्थानक, रेल्वे स्थानक किंवा कधी कधी लोकांच्या घरातूनही चोरी झाल्याचा घटना घडतात. मात्र, चक्क मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील (Mumbai) वार्ड क्रमांक 56 च्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका (Nagarsevak) लक्ष्मी भाटिया यांच्या बॅगेतून 20,000 रुपये चोरी गेल्याने नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे. नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांनी पैसे चोर झाल्यासंदर्भात महापौर, विरोधी पक्षनेत्या आणि स्थायी समिती अध्यक्षांकडे तक्रार देखील केली आहे.

महापालिकेची‘तिजोरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभागृहातच पर्स उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका व स्थायी समिती सदस्य लक्ष्मी भाटिया यांच्या पर्सची चैन बैठक संपल्यानंतर उघडी आढळल्याने सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर भाटिया जेवणासाठी बाहेर गेल्या होत्या, त्या परत आल्यावर पर्स उघडी असून छेडछाडीचा संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता पर्समधील 20 हजार रुपये गायब असल्याचे लक्षात आले. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने घटनेची खात्री करणे कठीण झाले आहे. या घटनेनंतर “स्थायी समिती म्हणजे महापालिकेची तिजोरी मानली जाते. याच ठिकाणी असा प्रकार होत असेल, तर सुरक्षेबद्दल काय म्हणायचं?” असा संतप्त सवाल लक्ष्मी भाटिया यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मनसे गटप्रमुख यशवंत किल्लेदार यांनीही या घटनेवरून पालिकेला खडेबोल सुनावत, “सभागृहातच सुरक्षेची अवस्था अशी असेल, तर सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय?” असा टोला लगावला.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पैसे कोणी घेतले यांचा शोध लावणे कठीण असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर मी पर्स ठेवून जेवायला गेले. मात्र, आल्यावर पर्सची चैन ओपन होती, सहकारी नगरसेविकेने देखील पाहिले आहे पर्स कशा अवस्थेत होती. मी एम.एस. डिपार्टमेंटच्या मॅडमला घडलेला प्रकार सांगितले आहे. मात्र, सीसीटीव्ही नसल्याने शहानिशा झालेली नाही, असे नगरसेविका भाटि यांनी म्हटले. सेक्युरिटी डिपार्टमेंटच्या पोलिसांना हा प्रकार सांगितला आहे, महापौर, विरोधी पक्ष, स्थायी समिती यांनाही विषय सांगितला आहे. मात्र, जर पालिकेच्या नगरसेवकांच्या पर्स सुरक्षित नाही? महिलांच्या पर्समधील पैसे घेणे कितपत योग्य? असा सवाल भाटिया यांनी उपस्थित केला. दरम्यान,या प्रकारामुळे पालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

प्रशासनाच्या नामुष्कीची गोष्ट

जिथे महापालिकेच्या अर्थकारणावर शिक्कामोर्तब होतो किंवा बजेट फाइनल केला जातो तिथे असे प्रकार होऊ लागले आहेत. ही प्रशासनाच्या नामुष्कीची गोष्ट आहे, अशा घटना घडता कामा नये, अशी प्रतिक्रिया मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी दिली.

हेही वाचा

वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी डॉक्टरांमधील करुणा अन् प्रामाणिकपणा महत्त्वाचा; राष्ट्रपती मुर्मूंचा सल्ला

आणखी वाचा

Comments are closed.