आगामी काळात मोठी महागाई, आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदाराचांही संताप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra modi) तेलंगणातील कार्यक्रमात बोलताना देशवासियांना महत्वाचं आवाहन केलं असून नागरिकांनी वर्षभर सोनं न खरेदी करण्याचा सल्ला मोदींनी दिला. तसेच, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करुन सार्वजनिक वाहतूक वापरण्यावर भर देण्याचे सूचवले. यासह पंतप्रधान अनेक आवाहने देशवासियांना केली आहेत. त्यावरुन, आता नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर, विरोधकांनीही मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणुका झाल्यानंतरच मोदींनी हे आवाहन का केलंय, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडीतील नेते खासदार अरविंद सावंत (Arvind sawant) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही मोदींना सवाल केले आहेत.

येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेत. घोडा, गाय, म्हैस काय स्वस्त विकणार? जय मोदी, जय मोदी करत गाय-घोडे यांच्यावरती बसून प्रवास करावा लागणार आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. तसेच, येणाऱ्या काळात पेट्रोल मिळणार नाही, अचानक असे काय झाले मोदींना, पेट्रोल डिझेल कमी वापरा म्हणून ते सांगत आहेत. पश्चिम बंगालचे इलेक्शनपर्यंत ही सर्व नौटंकी होती, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. अर्थव्यवस्था एवढी ढासळली आहे, आपला गळा दाबला जाणार आहे, आपण यातून सुटू शकणार नाही. देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम हे सरकार करत होतं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

आगामी काळात मोठी महागाई – आव्हाड

मुस्लिम द्वेष निर्माण करतात, हिंमत असेल तर पेट्रोल डिझेलवर बहिष्कार घाला. घोडा, बैल मागवा आणि त्यांच्यावर बसून प्रवास करा. मुसलमानांवर बहिष्कार टाका, त्यांच्या वस्तीवरती बहिष्कार टाका, हे सरकार शिकवत आहे. मुस्लिम संदर्भात बोलत आहे. आगामी काळात येत्या काही दिवसात पाहिली नाही अशी महागाई निर्माण होईल, असे भाकीतच आव्हाड यांनी केले. तसेच, मुंबईलाला रोज कामावर चालत जावा हीच देशभक्ती, असेही आव्हाड यांनी म्हटले.

एसआयआरमधून मतकपात

सध्या SIR महाराष्ट्रातदेखील सुरू आहे, लोक गंभीर घेत नाहीत. बंगालमध्ये एसआयआरचा परिणाम होणार होता, हे सर्वश्रुत होते, तिथे 91 लाख मत कापले गेले आहेत. एसआयआरमुळे अनेक गळे परत कापले जातील, ही ठरवलेली बीजेपी पॉलिसी आहे, असेही आव्हाड यांन म्हटले.

अरविंद सावंत यांचाही संताप (Arvind sawant on modi appeal)

निवडणूक संपल्या की आता त्यांना आठवतंय. सोन्याचे भाव आधीच गगनाला भिडले होते, आत्ता त्यांना हे सगळं आठवतंय. त्यांना माणसं जगो वाचो काहीही घेणं नाही, त्यांना फक्त सत्ता हवी आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनावरुन तीव्र संताप व्यक्त केला.  तुम्ही मग हे 6 महिने आधी का केलं नाही, काल परवा नाशिकला गेलो होतो, इगतपुरी-नाशिक वाळवंट केला आहे, असेही सावंत यांनी म्हटलं.

लोकासांगे ब्रम्हज्ञान… तुम्ही जगभर फिरता आणि म्हणतात देशासाठी फिरतो. तुमची ढोंगी भूमिका आहे, या ढोंगामुळे देशाचं वाटोळं झालंय. मोदींनी आवाहन केलं हे हास्यस्पद नाही, त्यांची कीव येते. देव देव करता ना, तो तुम्हाला सद्बुद्धी देत नाही का? असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारला. तसेच, मृगजळाच्या मागे आपण धावतोय. आता देशबांधव का घाबरले? तुम्ही विकले जाता, निवडून का देतात अशांना, संकट आलं की शिवसेनेकडे येता, आमचं सरकार होतं तेंव्हा पेट्रोल डिझेलचा काय भाव होता, असा सवाल जनतेलाही विचारला.

न्यायपालिका अस्तित्वात आहे का?

दरम्यान, देश लाचारीच्या अवस्थेत आहे आणि तुम्ही लोकांना सुद्धा लाचार करताय, असे म्हणत सावंत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. न्यायपालिका अस्तित्वात राहिली आहे का? हा सुद्धा प्रश्न आहे, सगळे गुलाम बसले आहेत न्यायपालिकेत, अशा शब्दात सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

हेही वाचा

व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज

आणखी वाचा

Comments are closed.